Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

गझलकार राज शेळके Gazalkar Raj Shelke

 

Gazalkar Raj Shelke
Gazalkar Raj Shelke

नमस्कार मित्रांनो,

 आनंदकंद या वृत्तासाठी गझल मंथन ने आयोजित केलेल्या एक मतला दोन शेर या उपक्रमास आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वप्रथम आपले हार्दिक अभिनंदन. सन्माननीय गझलकारांनी यासाठी दिलेल्या सदिच्छा आपल्या सोबत होत्याच.


 पाच वर्षापासून गझल मंथन या उपक्रमांसाठी सातत्याने परिश्रम घेते आहे. त्याचेच फळ म्हणून आज महाराष्ट्रामध्ये शेकडो गझलकार लिहू लागलेले आहेत.


  या 15 तारखेच्या उपक्रमात अनेक नवीन गझलकार मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली, त्याबद्दल मी त्या  सगळ्यांचे अभिनंदन करतो. आनंदकंद हे तसे काही अवघड वृत्त नाही. त्यामुळे या वृत्तामध्ये गझल लिहिणे हा एक आनंदाचा सोहळा असतो. गझलमंथन च्या विविध समूहांवर आपण नियमितपणे इतर सन्माननीय गझलकारांच्या गझला वाचत असता. त्यानुसार आपल्याही गझलांमध्ये सुधारणा होत असतात. म्हणूनच या वेळेला  मतला व शेर यामध्ये अधिक काही चुका सापडल्या नाहीत. सर्वांचा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे. काही ठिकाणी लगावली तर काही ठिकाणी यती आणि काही ठिकाणी काफिया याबाबत गल्लत झालेली आढळली.  त्या ठिकाणी त्यांना त्याप्रमाणे सांगितले गेले आहे.


 प्रत्येक गझलकार हा आजन्म विद्यार्थीच असतो.  तसाच मीही आहे. त्यामुळे सांगितल्या गेलेल्या सूचनांबद्दल अजिबात मनात आकस न ठेवता आपण त्यानुसार आपली रचना आणखी चांगली करण्याचा प्रयत्न करत राहूया. एक मतला व दोन शेर जरी अपेक्षेप्रमाणे  उतरले असले तरीसुद्धा गझलेमध्ये असलेला जो गझलियत चा भाग आहे, तो या  शेरांमध्ये मला थोडा कमी जाणवला.


शेर वाचल्या किंवा ऐकल्याबरोबर मन भरून यावं किंवा हृदय उचंबळून यावं, असं खूप कमी वेळा जाणवलं. आपण सर्वांनी ही गोष्ट साध्य करण्यासाठी अहोरात्र झटले पाहिजे. तंत्र शिकल्यानंतर महत्त्वाचा मंत्र असतो. तो मंत्रही आपल्याला अनुभवाने हळूहळू आत्मसात होतच असतो. त्यासाठी इतरांचे संग्रह विकत घेऊन वाचणे, ऐकणे, पाहणे व आपल्या लिखाणात हे सगळे येते की नाही हे पहाणे महत्त्वाचे असते. बरेच गझल लेखक स्वतःचे लिहिण्याचा खूप प्रयत्न करतात परंतु त्यांनी इतरांचे काहीही वाचले/ लिहिले/ऐकलेले नसते, अशा वेळेला त्यांच्या लिखाणामध्ये काही त्रुटी राहण्याचा संभव नक्की असतो. म्हणून गझलकार बनण्याअगोदर चांगला वाचक बनणे फार  आवश्यक आहे.


 गेल्या वर्षी आणि त्याच्या अगोदरच्या वर्षांमध्ये जे गझलकार सातत्याने उपक्रमामध्ये  सहभाग घेत होते, त्यांच्या रचना या उपक्रमामध्ये  जाणवल्या नाहीत यावरून त्यांना आता बऱ्यापैकी गझल निर्दोष लिहिणे साधू लागले आहे असा मी अर्थ घेतो.

 काही वेळा गझलेकडे जाता जाता अचानक रस्ता कवितेकडे वळू लागतो. तिथे थोडेसे वळण असते त्याचे भान आपण ठेवायला पाहिजे. शेरातली पहिली ओळ दिल्याबरोबर रसिकाची उत्सुकता ताणली गेली पाहिजे आणि दुसऱ्या ओळीच्या समारोपाने त्याला अख्खी कविता वाचण्याचा आनंद  झाला पाहिजे.


 आपल्या सर्वांच्या प्रवासात ही गोष्ट आपल्याला नक्कीच साध्य होणार आहेच असं मला विश्वास वाटतो. सर्वांना खूप खूप शुभेच्छा.


-श्री राज शेळके, नाशिक

Post a Comment

0 Comments