Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

आधुनिक मराठी गझलेत काव्यमय शब्दरूपांना कितपत स्थान असावे..? Gazalkara Dr Snehal Kukarni

 आधुनिक मराठी गझलेत काव्यमय शब्दरूपांना कितपत स्थान असावे..?

मराठी गझल
Gazalkara Dr Snehal Kulkarni 


           गझल म्हणजे .. गझलकाराने प्रेयसीशी, देवाशी, आत्म्याशी, स्वतःशी,रसिकाशी,सामान्य व्यक्तीशी..एखाद्या विशिष्ट व्यक्तीरेखेशी.. विषयाशी,विचाराशी,  विचारधारेशी...साधलेला संवाद असतो. आपण कोणाशीही संवाद साधताना सहज सोप्या बोली भाषेत साधत असतो.त्याप्रमाणे शेर लिहिताना सहज सोप्या,प्रमाण व प्रासादिक शब्दांचा वापर केला तर शेर जास्त उठावदार होतो.ज्यामुळे समोरच्याशी जास्त जवळीक साधली जाते... यासाठी..गझलेचा शेर संवाद शैलीतील, सहजसुंदर, आपलेसे करणारा असावा. शेरात एखाद्या वेळेस...एखादे दुसरे काव्यमय शब्दरूप ही जर... त्या जागेचीच मागणी असेल...तो शब्द त्या ठिकाणी सहज चपखलपणे बसत असेल आणि त्या शेराची, खयालाची उंची ही त्या वापरलेल्या काव्यमय शब्दाच्या कक्षेपलीकडची असेल तर... तो शब्दही भाव खाऊन जातो...कारण तो शब्द त्या *नेमक्या जागी परफेक्ट असतो.

    

      एकंदरीत गझलेचा इतिहास पाहता सुरवातीपासूनच, पारंपरिक  मराठी गझल शृंगारासोबत विपुल प्रमाणात  वैचारीक  आशयही घेऊन आली असं दिसून येतं .असं असलं तरीही  प्रारंभी तिच्यावर  प्रेम , प्रणयभावनेचा जास्त पगडा होता , ती भावगझल होती , आर्ततेसोबत ती जास्त लयबद्ध , गेय, अलंकारीक  होती असं निदर्शनास येतं .त्याकाळी गझल जास्त प्रमाणात गायली जायची त्यामुळे तिचे भाषिक सौंदर्य , नादमधुरता, शब्दलालित्य .यांना विशेष महत्व प्राप्त झाल होतं. साहजिकच तेव्हा गझलेत काव्यमय शब्दांचा, शब्दरूपांचा वापर जास्त प्रमाणात व्हायचा.


      कवी माधव ज्युलियन यांनी गझलेचे छंदशास्त्र लिहून गझल प्रथम मराठीत आणली .गझल हा काव्यप्रकार मराठीत रुजवण्याचे पहिले श्रेय त्यांचे .१९३३ मधे त्यांचा ' गज्जलांजली ' हा पहिला मराठी गझलसंग्रह प्रकाशित झाला .त्या काळातही त्यांनी आधुनिक विचारांची मांडणी गझलेतून केलेली दिसून येते तर त्यांच्या काही  गझलांमधे आपल्याला ' प्रेम' हा स्थायीभाव दिसून येतो, काव्यमय शब्द आढळतात व त्यामुळे त्यात एक प्रकारची नजाकत आढळून येते .नाजूकता , तरलता जाणवतं राहते .त्यांचा  एक शेर पहा 


लाज जरा हास जरा हास तू 

लाजव या मत्त गुलाबास तू 


         त्यानंतर बराच कालावधी गेला .त्या दरम्यान  ना .घ .देशपांडे , अनिल , विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर , ..आणि काही तत्सम कवींनी गझल लिहिली पण त्यात विशेषता किंवा सातत्य नव्हते. १९६० मधे आ .सुरेश भट यांनी

मराठमोळा चेहरा, मराठ्या मातीचा गंध देऊन गझल मराठीत आणली.

मराठी गझल साहित्याचे ते मानदंड समजले जातात .त्यांनी मराठी गझलेला एक वेगळा आयाम दिला आणि रसिकांनी तिच्यावर भरभरून प्रेम केलं ..तिला अक्षरशः डोक्यावर घेतलं .अतिशय तरल , मोहक , हळव्या , हळुवार ..शब्दांत प्रेयस भाव मांडून रसिकाला एका वेगळ्याच विश्वात नेणं  ..ही त्यांच्या गझलेची खासियत .आपल्या शेरात त्यांनी शृंगारिक प्रेमभाव अत्यंत हळवेपणाने साकारला .

  

तरूण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ,

 केंव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली ..

 हे तुझे अशावेळी लाजणे बरे नाही ..


     अशी जीव हेलावून , वेडावून टाकणारी गझल लिहावी तर ती आ .सुरेश भटांनीच ....अशा कित्येक उत्तमोत्तम गझलांनी (ज्यात काव्यमय शब्दांचा, शब्दरूपांचा वापर होता )ते आजही तरूण रसिक मनावर अधिराज्य गाजवत आहेत ...यापुढेही गाजवत राहतील 

      पण आ.सुरेश भटांनी प्रेमाविष्काराबरोबरच शेरांमधून त्या काळची  राजकीय,सामाजिक , साहित्यिक परिस्थिती , समकालीन जीवनातील गुंतागुंत , चिंता  ...यावर भाष्य करणारे अनेक शेर  लिहिले. जे कालातीत आहेत .त्यांच्या शेरांमधील विविधता पाहून थक्क व्हायला होतं .  त्यांच्या गझलेत जशी नजाकत पहायला मिळते तसा ..झंंझावातही पहायला मिळतो .एकीकडे मृदू ,  अलवार, हळूवार प्रणयभावनेची अत्युच्च पातळी तर दुसरीकडे समाजव्यवस्थेेवर टीका करणारी सडेतोड तीक्ष्ण भाषा ..यावरून त्यांच्या विविधरंगी प्रतिभाशक्तीची प्रचिती येते . त्यांची गझल शृंगारासोबत वैश्विक विचारधारा घेऊन आली असली तरी ..आ .सुरेश भटांची गझल म्हटलं की डोळ्यासमोरं तरळते ..आर्तता , भावुकता , व्याकुळता ! !


      त्या काळापासून आजपर्यंत..काळाचा प्रभाव ' होऊन  गझलेत अनेक स्थित्यंतरे झाली .प्रेम , शृंगारासोबत शेर बहूआयामी ..आशय लपेटून येऊ लागले.साहजिकच आधुनिक गझलेत  गेयतेपेक्षा खयालावर जास्त भर दिलेला दिसून येतो .आधुनिक शेर भाषिक सौंदर्यापेक्षा आशयाला जास्त महत्व देणारा, खयालाधिष्ठीत असलेला दिसून येतो .अर्थातच निव्वळ शाब्दिक  सौंदर्यापेक्षा आशय आणि सौंदर्य असं combination असलेला शेर जास्त दर्जेदार वाटतो .दोन ओळी भावगीताच्या स्वरूपात लिहिल्या तर खयाल कमजोर वाटतो .त्यामुळे भाषिक सौंदर्याने युक्त  गझलेची पूर्वापार काव्यात्मक शैली ..जास्तीत जास्त संवादात्मकतेकडे नेणे ही काळाची गरज बनली आहे. आणि ही शैली रसिकांनाही मनापासून आवडत आहे .अगदी सहजसोप्पे शेर न लिहिता ..रसिकांना अंतर्मुख करणारे , त्यांच्या विचारांना चहूबाजुंनी चालना देणारे,  त्यांच्या बौधिक क्षमतेला आव्हान देणारे ..काहीसे अनाकलनीय म्हणता येतील असे  पण पूर्ण विचारांती आकलनक्षमतेची सर्व दारे खुली करुन एक वेगळंच वैश्विक सत्य आपणासमोर मांडणारे शेर ...आधुनिक गझलकारांच्या लेखणीतून उतरत आहेत .अर्थातच आधुनिक गझल लिहायची म्हणजे पूर्ण अनाकलनीय , आवश्यकता नसताना इतर भाषेच्या कुबड्या घेऊन लिहिणं किंवा आदरणीय सुरेश भट यांना अपेक्षित असलेले गझलेचे तंत्र, नियम, निकष धाब्यावर बसवून लिहीणे ..असं अज्जिबात नाही .कालानुरूप बदललेली , स्थित्यंतर स्वीकारलेली पण नीतिमत्ता न सोडलेली भाषाशैली जर आशयगर्भता घेऊन आली तर ती जाणकार रसिकाला निश्चितपणे आवडते ..आपलीशी करते .त्यामुळे आधुनिक गझल लिहिताना काव्यमय शब्दाची अपरिहार्य जागा सोडून.. इतरत्र अशा शब्दांचा वापर टाळावा.

   *इथे काव्यमय शब्दाची शेरातील अपरिहार्य जागा.... हा मुद्दा प्रत्येक गझलकाराने स्वतःच्या विचारधारेनुसार, आकलनशक्तीनुसार..

प्रतिभाशक्तीनुरूप तासून पहायचा आहे. काव्यमय शब्द म्हणून... शब्दांची अपूर्ण, सदोष रुपे... जसे की


दारात.. दारी

असते.. असती 

प्रपंची.. प्रपंचामधे इ.


आनंदसाठी.. मोद, तोष, हर्ष.. असे शब्द


चुकीचे, अनावश्यक विभक्तीप्रत्यय लावलेले शब्द

केसाने गळा कापणे ☑️

केसाने गळ्याला कापणे ❌️

जळाया लागले, कळाया लागले ❌️

जळू लागले, कळू लागले ☑️

अता ❌️ आता ☑️


बोलण्यातून कालबाह्य झालेले शब्द....

तुज, मज, तुजला, तयाचा, सदा .. इ


काही ठराविक भागातच वापरले जाणारे.. आणि त्यामुळे सर्वार्थाने संप्रेषित न होणारे शब्द... यांचा वापर टाळता आला तर..शेर अधिक घोटीव, लक्षवेधी,रूपलक्षी, उठावदार होतो 


          कोणताही शेर लिहीत असताना खयालाबरोबरच  गझलेचे तंत्र , व्याकरण , शुद्धलेखन , मांडणी , प्रासादिकता.गझलीयत,  वैविध्य ,सहजता , ऱ्हस्व, दीर्घची सूट ,   जुना .. परिचित खयाल नवीन पद्धतीने , नव्या दृष्टीकोनातून मांडण्याचे कसब  ...या गोष्टींचा विचार करणं, होणं अपरिहार्य आहे.ऱ्हस्व, दीर्घची सूट घेताना ती चटकन डोळ्यात भरणार नाही, खटकणार नाही...हे कटाक्षाने पाळावे. मूळ दीर्घ शब्द आपण ऱ्हस्व करू शकतो पण मूळ ऱ्हस्व शब्द दीर्घ करता येत नाही हे  लक्षात ठेवावे.. आणि काही शब्दात सूट घेताच येत नाही हे ही मान्य करावे

आणि या अपरिहार्यतेबरोबरच.... अचूक शब्दाची नेमकी जागा... अर्थाची नस पकडणं... अत्यन्त महत्वाचे. अर्थाची अशी नस पकडत असताना.. जर एखाद्या जागेची मागणी काव्यमय शब्दच.. असेल तर ती मागणी पूर्ण व्हायलाच हवी.आपली रचना अव्वल बनवणं... हे आपलं अंतीम उद्दिष्ट आहे.. ते साध्य व्हायला हवं..व्याकरणाचे, शुद्धलेखनाचे सर्व निकष सांभाळून येणारा साधा शेरही चित्ताकर्षक ठरतो.

इतकंच....!!!


डॉ. स्नेहल कुलकर्णी

गारगोटी (कोल्हापूर)

मो.  9922599117



_______________

 

🌹 साहित्य पाठवा 🌹


गझल मंथन साहित्य संस्थेचा स्वतंत्र ब्लॉग सुरू आहे. या माध्यमातून गझल, लेख, पुस्तक परीक्षण आदी साहित्य प्रकाशित करण्यात येते. साहित्यिकांनी आपले साहित्य प्रकाशित करण्यासाठी खालील नंबरवर संपर्क साधावा.


संयोजक- भरत माळी

मो. 9420168806

_______________

Post a Comment

0 Comments