पुस्तक परिचय
'मराठी गझल : १९२० ते १९८५'
मराठी गझलेच्या जडणघडणीचा
इतिहास सांगणारा ग्रंथ
आद्य मराठी गझलसंशोधक आणि ज्येष्ठ गझलकार डाॅ. अविनाश सांगोलेकर यांच्या 'मराठी गझल : १९२० ते १९८५'या संशोधननिष्ठ समीक्षाग्रंथाचा परिचय व परीक्षण (भाग ३)
आद्य मराठी गझलसंशोधक, ज्येष्ठ गझलकार डाॅ. अविनाश सांगोलेकर यांचा परिचय, त्यांचे मराठी गझलक्षेत्रातील संशोधनाचे कार्य व हे कार्य हाती घेण्यामागची पार्श्वभूमी तसेच त्या वेळची परिस्थिती यांची थोडक्यात माहिती आपण लेखाच्या पहिल्या व दुस-या भागात घेतली. 'मराठी गझल : १९२० ते १९८५' या त्यांच्या ग्रंथाच्या अंतरंगाविषयीचा आढावा आपण लेखाच्या या म्हणजेच भाग - ३ मध्ये घेऊ.
प्रस्तुत ग्रंथाच्या पहिल्या प्रकरणात गझल म्हणजे काय, तिचा उगम कसा आणि कुठे झाला, गझल भारतात कशी आली, तसेच गझलगायन याबद्दलची सविस्तर माहिती दिल्यानंतर ग्रंथकार डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी १९२० पूर्वीची मराठी गझल, तसेच माधव जूलियनपद्धतीची गझल यांचा सविस्तर आढावा घेतला आहे.
गझलेचा इतिहास सांगताना १९२० ते १९८५ या काळात गझलेच्या अभ्यासकांनी केलेल्या गझलेच्या सुमारे १५ व्याख्या त्यांनी दिलेल्या आहेत. पैकी ७ व्याख्या माधव जूलियन यांच्या, तर प्रत्येकी एक व्याख्या दे. ल. महाजन, प्रा. निशिकांत ठकार, वा. रा. कांत, प्रा. सुरेशचंद्र नाडकर्णी आणि सुरेश भट यांच्या आहेत. प्रेमभावनेचे गझलेतील महत्त्व म्हणजेच गझलेचे विषयवैशिष्ट्य सांगणा-या तीन व्याख्या माधव जूलियन यांच्या आहेत.
अरबी-फार्सी वृत्त, एकयमकीपणा,पाच किंवा त्यापेक्षा जास्त द्विपदी (शेर), प्रत्येक द्विपदीचे स्वतंत्र कविता म्हणून असलेले अस्तित्व, परमोच्च काव्यबिंदू गाठू शकणारी द्विपदी व द्विपदींची बांधणी अशी रचनावैशिष्ट्ये सांगणा-या प्रा. सुरेशचंद्र नाडकर्णी व सुरेश भट यांच्या व्याख्या या अधिक समर्पक आहेत, असे डॉ.सांगोलेकर स्पष्ट करतात. शिवाय "गझल म्हणजे उत्कर्षबिंदू गाठणा-या द्विपदींच्या पाच ते सतरा ह्या संख्यामर्यादेतील कवितांच्या अक्षरगणवृत्तात्मक व एकयमकी बांधणीद्वारा स्वच्छंदवादी वृत्तीचा उत्कट, प्रभावी व अर्थपूर्ण आविष्कार करणारा काव्यप्रकार होय", अशी अधिक व्यापक, तसेच सर्वसमावेशक व्याख्या डाॅ. अविनाश सांगोलेकरांनी दिलेली आहे.
अशा प्रकारे 'गझल' या काव्यप्रकाराच्या सर्व अंगांची सूक्ष्म, तसेच सविस्तर माहिती दिल्यानंतर ह्या प्रकरणाचा समारोप त्यांनी केला आहे.
पुढचे प्रकरण 'माधव जूलियनांची गझल' हे असून त्यात त्यांचा गझलविचार व त्यांचे गझलकार्य ह्याचा परिचय डॉ .सांगोलेकरांनी करून दिला आहे.अर्थात तो देण्याआधी त्यांनी १९२० पूर्वीच्या मराठी गझलेचाही थोडक्यात परिचय करून दिलेला आहे. यात त्यांनी अमृतराय - मोरोपंतांची गझल, त्यानंतरचे मराठी काव्यवाड्मय, संगीत नाटक आणि राष्ट्रीय मेळे यांमध्ये दिसणारी गझल यांचा आढावा घेतला आहे. अमृतराय (१६९८- १७५३) यांच्या 'जगव्यापका हरीला नाहीं कसें म्हणावें ?' या पदाच्या रूपाने 'गझल' हा काव्यप्रकार मराठीत अवतरला व हाच मराठी गझलेचा उगम आहे,असे स्पष्ट मत या ग्रंथात डॉ.सांगोलेकरांनी साधार मांडले आहे. मोरोपंत (१७२९ - १७९४) यांची 'रसने! न राघवाच्या.' व 'हृदया ! बरें विचारीं.' ही दोन पदेही गझलस्वरूप होत, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.
त्या काळचे मुस्लीम शासक, त्यांच्याबरोबर भारतात आलेली इस्लामी संस्कृती, सूफी साधुसंतांबरोबर भारतात आलेली फार्सी गझल, अमृतराय व मोरोपंत यांनी उत्तर भारतात तीर्थयात्रांच्या निमित्ताने केलेला प्रवास, हिंदी संतसाहित्याशी त्यांचा असलेला परिचय व नवीन गोष्टी जाणून घेण्याची त्यांची वृत्ती या सर्व कारणांमुळे 'गझल' हा परभाषिक काव्यप्रकार मराठीत हाताळला गेला. मात्र हे सत्य माधव जूलियन यांनीच सर्वात आधी १९२१ च्या सुमारास प्रकट केले,असे डॉ.सांगोलेकरांनी आपले मत व्यक्त केले आहे.
अमृतराय आणि मोरोपंत यांच्यानंतर संतकवी माणिकप्रभू यांनी एकयमकीपणाने युक्त अशी १८ पदे रचली. पुढील १८७० ते १९२० या काळात महादेव मोरेश्वर कुंटे (भुजंगप्रयात वृत्त), केशवसुत (पंचचामर वृत्त), बालकवी व रे.ना. वा. टिळक (वियद्गंगा वृत्त), भा. रा. तांबे (विबुधप्रिया वृत्त, तसेच सौदामिनी वृत्त) या पाच अर्वाचीन-आधुनिक कवींनी गझलवृत्तांमध्ये रचना केल्या. याही वृत्तांचा अधिक परिचय माधव जूलियन यांनी १९२० नंतरच्या काळात करून दिला. एकंदरीत १९२० पर्यंतच्या मराठी काव्यवाड्मयात गझल कमी प्रमाणात दिसून येते. मात्र ती अधिक प्रमाणात संगीत नाटके आणि राष्ट्रीय मेळे यांच्यामध्ये पदांच्या रूपात दिसून येते.
अण्णासाहेब किर्लोस्कर, गो. ब. देवल, वा. ना. डोंगरे, माधवराव पाटणकर, श्री.कृ.कोल्हटर,शि. म. परांजपे, कृ.प्र.खाडिलकर, वि. सी. गुर्जर, रा. ग. गडकरी या नऊ नाटककारांनी लिहिलेली नाट्यपदे ही गझलगायनाच्या अंगाने लिहिलेली आहेत. एखादी नवीन गोष्ट हाताळताना संभ्रमाची, गोंधळून जाण्याची, चाचपडण्याची अवस्था जशी निर्माण होते व त्यातून चुका होण्याची जी मनोवस्था असते; तीच अवस्था या १९२० पूर्वीच्या मराठी गझलांमधून पहावयास मिळते, असे मत डाॅ. सांगोलेकर यांनी नोंदवले आहे.
१९२० ते १९८५ या कालखंडाचे १९२० ते १९४०, १९४० ते १९६५ व १९६५ त १९८५ असे तीन छोटेछोटे भाग करून डॉ.सांगोलेकर यांनी मराठी गझलेच्या इतिहासाचा धांडोळा आहे. पैकी १९२० ते १९४० हा कालखंड 'रविकिरण मंडळाचा काळ' म्हणून ओळखला जातो. या मंडळाचे मुख्य कवी माधव जूलियन यांची गझल, त्यांचा गझलविचार व त्यांचे या संदर्भातील कार्य यावर डॉ.सांगोलेकर यांनी अधिक प्रकाश टाकला आहे.
कवी माधव जूलियन यांच्या गझलरचनेमागील, तसेच गझलपुरस्कारामागील पार्श्वभूमी याचा विचार आपण लेखाच्या पुढील भागात म्हणजेच भाग-४ मध्ये करू.
(क्रमश:)
---------------------------------
पुस्तकाचे नाव : 'मराठी गझल : १९२० ते
१९८५' (संशोधननिष्ठ समीक्षाग्रंथ)
(तृतीयावृत्ती),
ग्रंथकार : डाॅ.अविनाश सांगोलेकर,
प्रकाशक : मिहाना पब्लिकेशन्स, पुणे,
मुखपृष्ठ : राजेंद्र गिरधारी,
पृष्ठसंख्या : २९८,
किंमत : ३५० रुपये
---------------------------------
दिवाकर चौकेकर,
गांधीनगर (गुजरात)
0 Comments