🌸 पुस्तक परिचय 🌸
गझलेच्या आविष्कारातून बनला
‘जन्माचा कोलाज’
आयुष्याची टिपणे काढण्यात खूप काळ जातो. सरतेशेवटी ओंजळीत काही विविधरंगी तुकडे जमा होतात. हा असतो ‘जन्माचा कोलाज’ एकेक तुकडा म्हणजे एकेक शेर असतो. यालाच दुनिया गझल म्हणते. गझलेच्या आविष्कारातून बनलेला हा ‘जन्माचा कोलाज’ आहे. ताज्या ऊर्मीचे, नव्या ऊर्जेचे धाराशिवचे गझलकार दास पाटील यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘जन्माचा कोलाज’ या गझल संग्रहाची हीच कैफियत आहे. गझल ज्याच्या जगण्याचा अपरिहार्य भाग बनत जाते तेव्हा त्याला गझलेशिवाय दुसरे काहीच सूचत नाही. त्याच्या श्वासा-ध्यासात फक्त गझलच असते. दास पाटील हे गझलेने झपाटलेले गझलकार आहेत. ज्यांना खऱ्याअर्थाने गझल लिहायची आहे. त्यांची ही विधा मुळापासून समजून घेण्याची अपार कष्ट करण्याची, मनस्वी तयारी असावी लागते. दास पाटील या कष्टाच्या कसोटीला उतरले. त्यांनी सुरुवातीस सुरेश भटांचा ‘रंग माझा वेगळा’ संग्रहाची किती तरी वेळा पारायणे केली. भटांनीच तयार केलेली गझलेची बाराखडी अभ्यासपूर्वक वाचून काफिया, रदीफ, अलामत, वृत्त, आकृतीबंध समजून घेतला. परिश्रमपूर्वक अभ्यासानंतरच ते निर्दोष, तंत्रशुध्द गझला लिहू लागले. गझलेचा सच्चा सूर गवसल्याने त्यांची गझल सुसाट धावू लागली. त्यातूनच ‘जन्माचा कोलाज’ हा आशयघन गझलसंग्रह निर्माण झाला.
प्रस्तूत गझलसंग्रहाची अनेक वैशिष्ट्ये सांगता येण्यासारखी आहेत. आशयाबरोबरच यात विषयांचे विपुल वैविध्य आहे. गझलेची भाषा ओघवती, प्रासादिक आहे. काळजात घर करणारे कैक शेर पाटलांनी लिहिले. त्यांच्या गझलशैलीत मांडणीतील नाविन्यपूर्णता आहे, परिपूर्णता आहे. हे खचितच जाणवते. प्रीतीमधले हळूवार भावबंध उलगडताना त्यांची लेखणी कुसुम कोमल बनते. दुर्बल घटकांवर होणारा अन्याय, अत्याचार, विषमता, विसंगती, माणसाची लुच्चेगिरी, स्त्रियांची हेळसांड यासारख्या सामाजिक स्वरूपाचे अनेक गंभीर प्रश्न त्यांची लेखणी कठोर शैलीत वेशीवर टांगते. निसर्गाच्या विविध विभ्रमांची, मानवी नात्यातील गुंतागुंतीची उकलही करते. पाटलांच्या गझलांमध्ये अनोख्या, अस्पर्शीत काफिया, रदीफची रेलचेल पाहावयास मिळते. नवनवे रदीफ, काफिये सुचले म्हणून ते लगेच गझलेचा घाट घालत नाहीत. तर आशयाच्या मागणीनुसार त्यास गझलेच्या आकृतिबंधात बांधतात. त्यामुळे त्यांची प्रत्येक गझल वाचनीय ठरते.
झाडाची मुळे मातीचे अंतःकरण धुंडाळत खोलवर रुजतात. मातीचे अनामिक, अनावर दुःख ते शोषून घेतात. तेच आपणास झाडाच्या पानांमधून पाहावयास मिळते. मुळांनी शोषून घेतलेल्या दुःखामुळे झाडाची पाने हिरवीगार दिसतात. मुळे झाडांना मातीच्या अंतःकरणाने समजून घेतात. गझलकाराच्या सखोल निरीक्षणातून आलेला हा शेर पाहा.
काय होते शोषले इतके मुळांनी
दुःख हिरवेगार हे पानात होते
हुंदक्यावरूनच दुःखाची तीव्रता कळते. हुंदक्याला हासायची सवय लावली की उनाड अश्रुंना डोळ्यात जागा उरत नाही. हुंदका त्याचे काम करून जातो. हुंदक्याच्या शहाणपणासमोर अश्रुंचे काही चालत नाही. केवळ अश्रु ढाळत बसण्यापेक्षा हुंदक्याला हासण्याचे शहाणपण शिकविणे श्रेयस्कर ठरते. अतिशय वेगळ्या आशयाचा हा शेर आहे.
तो हुंदका शहाणा हासावयास शिकला
आता उनाड अश्रु डोळ्यात येत नाही
पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून पाखरांना हुसकावून लावण्यासाठी पिकात बुजगावणे उभे करण्याची पारंपरिक पध्दत आहे. आता काळ बदलला, माणसे बदलली, युक्ती बदलली. आता बुजगावण्यालाच चिमण्यांचा खोपा टांगण्यात येत आहे. अशा खोप्यात चिमण्या कशा काय येऊ शकतील. तरीही गझलकारास प्रश्न पडतोच की मग गोफणीने कुठली पाखरे हुसकावून लावण्यात आली? शेतशिवारातला हा प्रश्न इथून तिथून साऱ्यांना अंतर्मुख करणारा आहे. चित्रात्मक शैलीत शेर चितारणे म्हणजे काय असते हे या शेरावरून दिसून येते.
कधी बुजगावण्याला टांगला खोपा तुझ्या चिमणे
मघाशी गोपूणीने पाखरे हुलकावली कुठली
कोणत्याही सुंदर शेरास रसिकांची सहज दाद मिळते. पण हा सुंदर शेर सहज सुचत नाही. त्याकरिता गझलकारास अनेक दिव्यातून जावे लागते. व्यक्तिगत जीवनात कैक दुःखे पचवावी लागतात. आतल्या आत परिस्थितीचा प्रलय सोसावा लागतो. तेव्हा कुठे एखादा शेर सूचतो. निर्मितीची प्रक्रिया अतिशय वेदनादायी असते. ती केवळ निर्मिकालाच कळते. दास पाटील यांचा हा शेऱ पुरेसा बोलका आहे.
प्रलय सोसला आहे त्याला कळते
सहज कुठे हे सुचणे बिचणे काही
माणूस तेव्हा शिखरावर पोहोचतो तेव्हा त्याला पायाखाली आधार देणाऱ्या पायथ्यालाच तो विसरतो. त्याला जो लौकिक प्राप्त होतो त्यात पायथ्याचा मोठा वाटा असतो. हे नाकबुल करून चालत नाही. पण जो उभे करतो त्यालाच आडवे करण्याची माणसाची रीत आहे. पण पायथा टिकून राहतो. शिखराचे काही सांगता येत नाही. हे वास्तव लक्षात घ्यायला हवे.
नुसते पावा तर होता ना तुझ्याजवळ
ओळख ही लाभली तुला गोकुळामुळे
माणूस एक विचित्र जनावर आहे. त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या स्वभावाचा थांग लागू शकत नाही. तो चेहऱ्यावरून तर्हेतर्हेचे मुखवटे धारण करून वावरत असतो. अशी माणसे धोकादायक ठरतात. त्यांचा आंतरिक चेहरा श्वापदापेक्षा ही भेसूर असतो. गझलकाराच्या सूक्ष्म निरीक्षणापासून त्याचा हा चेहरा लपून राहू शकत नाही. एका शेरातून तो माणसाचा खरा चेहरा आपल्यासमोर ठेवतो.
पाहिले हे माणसांचे चेहरे निरखून जेव्हा
मग कळाले, श्वापदांचे चेहरे भेसूर नव्हते
समाजात राजरोसपणे दिसणारा विरोधाभासही पाटील हे सजगतेने टिपतात. एखाद्याचा मुडदा पाडण्यासाठी काही लोक वेळूच्या काठ्या घेऊन झुंडीने निघतात. तर एकजण त्याच रस्त्यावर वेळूची छान बासरी बनवत बसलेला असतो. या वेळूच्या काठ्यांनी एखाद्याला मारहाणही करता येते. त्याच काठ्यांची छान बासरी बनवून सुंदर सूरही छेडता येतात. लोकांना रिझवता येते. वेळूच्या काठांचा उपयोग नेमका कशासाठी करायचा असतो. हे गझलकाराने सोदाहरण सांगितले आहे.
वेळूच्या काठ्यांना घेऊन लोक निगाले झुंडीने
आणि एकजण रस्त्यावर छान बासरी बनवत आहे
अगदी छोट्या गोष्टीवरून देखील माणसे लगोलग हमरी तुमरीवर येतात. ती सूडभावनेने पेटलेली असतात. इकडे कुणी दगड उचलतो तर तिकडे कुणी वीट उचलतो. ‘ईट का जवाब पत्थर से ’ असाच हा मामला असतो. पण यामागील ‘मास्टर माईंड’ नामानिराळा राहतो. माणसांना नाहक झुंजवत ठेवण्याचे धोरण ओळखण्याची आवश्यकता असते. पण दुर्देवाने तसे घडताना दिसत नाही. बेभान माणसे तत्काळ हातघाईवर येतात. अशा माणसांनी पाटलांचा हा शेर आवर्जुन वाचायला हवा असे वाटते.
इकडे ह्याने दगड उचलला, वीट उचचली त्याने ही
ज्यांनी हे हातात दिले त्या मेंदूचे धोरण ओळख
जन्माचा कोलाज : गझल संग्रह
गझलकार : दास पाटील
प्रकाशक : समग्र प्रकाशन, तुळजापूर
पृष्ठे : ९६, मूल्य : १८० रुपये
बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर सोलापुरी)
0 Comments