🌸 पुस्तक परिचय 🌸
🌷अर्थपूर्ण गझलांची पर्वणी🌷
गझल हा तद्दन तांत्रिकदृष्ट्या साचेबध्द, कृत्रिम काव्यप्रकार असल्याची टिका करत प्रारंभीच्या काळात मराठी गझलेची घोर उपेक्षा करण्यात आली. हे सर्वश्रृत आहे. परंतू सध्याच्या काळात गझलेसाठी पोषक अन् पूरक वातावरण तयार झाल्यामुळे गझल मोठ्य प्रमाणात लिहिली जात आहे. आजमितीस गझलेचा सर्वत्र बोलबाला आहे. विशेषतः ग्रामीण भागातून सकस गझलकार उदयास येत आहेत. ही गझल वाङ्मयाच्या उत्कर्षाच्या दृष्टीने मोठी जमेची बाजू आहे असे म्हणता येईल. गझलेचा आब राखून दर्जेदार लेखन करणारे धाराशिवचे समकालातील प्रतिभावंत गझलकार बाळ पाटील यांचा पुणे येथील स्नेहवर्धन प्रकाशनातर्फे ‘नामनिराळा’ हा गझलसंग्रह प्रकाशित झाला आहे. यात १०१ गझलांचा समावेश आहे. गझलरसिकांसाठी ही भरगच्च पर्वणीच म्हटली पाहिजे.
पाटील यांनी चौकस अभ्यासाने, व्यासंगाने, चिंतनाने निसर्ग, अध्यात्माबरोबरच सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक असे अनेक विषय लीलया हाताळले आहेत. तसेच माणसाचा अप्पलपोटी स्वभाव, त्याची वाढत जाणारी हाव, त्याच्या अंतरात दबा धरून बसलेल्या राक्षसी प्रवृत्तीवरही गझलांमधून प्रखर प्रकाशझोत टाकला आहे. ते तीक्ष्ण निरीक्षणातून प्रत्येक विषयावर आडपडदा न ठेवता मर्मग्राही भाष्य नोंदवितात. ते थेट वाचकांच्या काळजाला हात घालतात. या गझलकारांकडे विषयाबरोबरच आशयाचीही संपन्नता आहे. त्यामुळे आशयाच्या पातळीवर त्यांचा एकेक शेर म्हणजे एक परिपक्व विचार, जीवनविषयक ठोस तत्वज्ञान मांडत एका संपूर्ण कवितेचा अर्थपूर्ण प्रत्यय देत राहतो. पाटील यांच्या गझलेचे वैशिष्ट्य असे की ते कोणत्याही शेरात शब्दांचा घोळ घालत नाहीत. ओढून ताणून रदीफ कफियांची योजना करीत नाहीत. त्यांचे शेर सहजस्फूर्त, सहजसंवादी आहेत. गझलीयत पेश करणारे आहेत. आपले म्हणणे, सांगणे दोन ओळीच्या एका शेरात नेमकेपणाने मांडण्याची चपखल हातोटी त्यांना साध्य झाली आहे. सिध्दहस्त गझलकाराप्रमाणे ते शब्दांना वाकवितात. हे कसब गझलकारांपाशी असणे आवश्यक आहे. जाणकार रसिकांना हा गझलकार आश्वस्त करणारा आहे.
गझलेचा प्रवास करणे म्हणजे दिव्यातून जाण्यासारखेच आहे. गझल कुणालाच सहज साध्य होत नाही. गझल डोक्यात पूर्णत्वाने भिनावी लागते, मुरावी लागते. गझलचे गुण रक्तात मिसळावे लागतात. त्याशिवाय वृत्तीतले वृत्तांत येत नाही. ही खूप कठिण गोष्ट आहे. जी पाटलांनी समर्थपणे पेलली आहे. म्हणून ते अनुभूतीतून असा नितांत सुंदर शेर लिहितात.
गझले तुझे जसे गुण, रक्तात येत गेले
वृत्तीतले जरासे वृत्तात येत गेले
पाटील यांच्या अनेक शेरांना अध्यात्माचे अधिष्ठान लाभले आहे. विठ्ठलाचा रंग काळा असला तरी तो सगळ्यात मिसळून आहे. तरीही तो निराळा आहे. विठ्ठलाच्या ठायी दुजाभाव नाही. अठरा पगड जातींच्या भक्तांच्या भक्तीत तो ठळकपणाने दिसतो. सर्वांना सरसकट समावून घेणाऱ्या काळ्या मातीशी ही त्यांचे दृढ नाते आहे. देहभान हरपून मातीत राबणाऱ्या कष्टकऱ्यांच्या घामात तो नाहतो, सगळ्यात मिसळूनही तो नामानिराळा आहे. पाटील यांच्या ‘नामानिराळा’ या पुस्तकाच्या शिर्षकावरून हेच ध्वनीत होते. विठ्ठलाच्या काळ्या रंगाकडे पाहण्याचा हा निराळा दृष्टिकोन आहे.
सांगतो मज विठ्ठलाचा रंग काळा
मिसळुनी सगळ्यात तो आहे निराळा
अध्यात्मातूनच सकारात्मकतेचे बीज काळजात पेरले जाते. सकारात्मकतेशिवाय जगण्याला अर्थ प्राप्त होत नाही. नकारात्मकतेतून विध्वंसकता जन्माला येते. नद्याही जेव्हा जातधर्म घेऊन वाहू लागतात. जागोजागी माणसाला आडव्या येऊ लागतात. तेव्हा निखळ माणुसकीचा विचार करणार्यां धर्मनिरपेक्ष माणसांची मोठी गोची होते. आजच्या राजकीय आणि सामाजिक संभ्रमाच्या, संघर्षाच्या काळात माणसांनी माणसांना जोडणे अत्यावश्यक आहे. त्याकरिता प्रत्येकानेच काळजाचे पूल झाले पाहिजे. पाटलांनी दिलेला संदेश विद्यमान काळात लाखमोलाचा आहे.
आडव्या या जात, धर्माच्या नद्या
काळजाचे पूल झाले पाहिजे
‘मुंगी होऊन साखर खावे’ असे पूर्वजांनी सांगून ठेवले आहे. ते उगाच नाही. मुंगी झाल्याशिवाय साखरेचे महत्व लक्षात येत नाही. कुणालाही उपद्रव न देता मुंगी होता आले की, जगण्यात कशाचीच कमतरता भासत नाही. अवघ्या आयुष्याचीच साखर होऊन जाते. ‘नामानिराळा’ राहून गझलकाराने वेगळ्या प्रतिकातून आयुष्याचे तत्वज्ञान उत्तमरीतीने विशद केले आहे.
मुंगी झालो तेव्हा कळले
आयुष्याची साखर होते
कोणत्याही क्षुल्लक कारणावरून खुलेआम दंगली घडतात. मोठ्या प्रमाणात रक्तपात घडतो. याचे कोणालाच काही वाटत नाही. माणसांच्या संवेदना बधीर झाल्या आहेत. माणसे दिवसेंदिवस निर्ढावत चालली आहेत. पूर्वीचा तो थरकाप आता राहिलेला नाही. रक्तपाताकडे सहज पाहण्याची माणसाची जणू प्रवृत्तीच बनत चालली आहे. माणसांच्या निर्दयीपणावर, त्यांच्या असंवेदनशीलतेवर गझलकाराने अतिशय मर्मग्रही भाष्य केले आहे.
खूनखराबा सहज पाहतो आम्ही
आता तो थरकाप राहिला नाही
घनदाट माणसांनी वेढलेला हा भवताल पागल करणारा आहे. कुणालाच कुणाशी काही देणे घेणे नाही. माणून स्वार्थापलीकडे काहीच पाहू शकत नाही. जो तो आपल्या कोशात बंद आहे. पाखरांसारखा मोकळेपणा, निरपेक्षपणा माणसांच्यापाशी आढळून येत नाही. माणसे अन् पाखरे यांच्यातील मूलभूत फरकच या शेरातून स्पष्ट होतो.
भवताल माणसांचा लावून वेड गेला
अन् पाखरात आलो तेव्हा सुधारलो मी !
पाटलांचा आत्मविश्वास दुर्दम्य आहे. काळावर मात करून किंबहुना काळास गळाला लावून उद्याचे गीत गावून येणारा हा जिद्दी गझलकार आहे. उद्याचे हे गीत अर्थातच मानव मुक्तीचे, उज्जवलतेचे, जगाच्या चांगुलपणाचे असणार आहे. अंतकरण विशाल असले की सामर्थ्य आपोआपच प्राप्त होत जाते. मग काळ ही कस्पटासमान वाटू लागतो. प्रस्तुत शेराकडे विशाल दृष्टिनेच पाहावे लागते.
काळास गळाला लावून आलो आहे.
मी गीत उद्याचे गावुन आलो आहे
केवळ धरणावरून पाण्याचा अंदाज बांधता येत नाही. प्रत्यक्षात धरणावर गेल्यानंतरच धरणात खरोखर किती पाणी आहे, हे लक्षात येते. तद्वतच अश्रुंचेही अनेक नमुने असतात. अनेक बहाणे असतात. अश्रु खरे की खोटे हे ही सांगता येत नाही. अश्रु दुःखाचे असतात, अश्रु आनंदाचे असतात. अश्रुंचे किती बहाणे असतात हे सरणावर गेल्यावरच कळते. वास्तवाची सोबत करणारा शेर पाटील असा लिहितात.
खरेच पाणी आहे नाही, ते धरणावर कळते
किती बहाणे अश्रुंचे ही, ते सरणावर कळते
‘नामानिराळा’ गझलसंग्रह म्हणजे अर्थपूर्ण गझलांची भरगच्च पर्वणी आहे. रसिकांनी त्याचा आस्वाद घेतलाच पाहिजे.
नामानिराळा : गझलसंग्रह
गझलकार : बाळ पाटील
प्रकाशक: स्नेहवर्धन प्रकाशन
पृष्ठे : ११७, मूल्य २०० रु.
बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर सोलापुरी)
0 Comments