उर्मिला समजून घेतांना....
येतात लोक काही, जातात लोक काही
गर्दीत माणसांच्या माणूस मात्र नाही
अश्या खऱ्याखुऱ्या माणसाचा शोध घेणाऱ्या, त्याच्या जाणिवा, जखमा तरलपणे मांडणाऱ्या ... गझलांचा संग्रह म्हणजे "उर्मिला" आ. गझलगुरु उर्मिला माई बांदिवडेकर ह्यांचा हा पहिला गझल संग्रह. मराठी गझलेच्या प्रसार आणि प्रचारासाठी झटणाऱ्या गझल मंथन साहित्यसंस्थेने आ. गझलगुरु उर्मिला माई बांदिवडेकर ह्यांचा गझल संग्रह प्रकाशित केला आहे. हा संग्रह म्हणजे विविध विषयांवरील 101 गझलांचा सुरेख ठेवा आहे. वयाच्या 75 व्या वर्षी आ. माईंनी आपला पहिला गझल संग्रह प्रकाशित केला आहे. आ माई गझल कार्यशाळांच्या माध्यमातून गझल तंत्र अतिशय सॊप्या पद्धतीने शिकविण्यासाठी विनामूल्य कार्यशाळा सातत्याने घेत असतात... ह्या योगे मराठीत नवनवीन गझलकार पुढे यावेत आणि गझल अधिक समृद्ध होत जावी हा प्रांजळ हेतू बाळगून ह्याही वयात त्या तरुणांना लाजवतील इतक्या उत्साहाने कार्य करतात. आपला हा गझल संग्रह त्यांनी गझल मंथन साहित्य संस्थेस आणि कार्यशाळेतून गझलेचे वेड जोपासणाऱ्या साधकांना समर्पित केला आहे... हे वाचून नकळत डोळे पाणावले... आ.माईंचे गझलेसाठी कार्य हृदयाच्या किती खोल झिरपले आहे, किती निःस्वार्थ आहे ह्याचीच ही पावती. संग्रहाला ख्यातनाम गझलकार आ. बेफिकीर सर(भूषण कटककर) ह्यांची सुरेख प्रस्तावना तर आ.निलेश कवडे सरांचा समारोप लाभला आहे... दोन्हीही अतिशय अभ्यासपूर्ण आहेत, वाचनीय आहेत.
नव्याने गझल आत्मसात करू पाहणाऱ्यांसाठी हा संग्रह अत्यंत मार्गदर्शक आहे. प्रत्येक गझलेच्या शीर्षकानंतर ते मात्रागण वृत्त आहे की अक्षरगण वृत्त आणि त्याच्या मात्रा/ लगावली ह्यांचे साद्यन्त लेखन आहे. गझल संग्रहात निरनिराळ्या विषयांवरील गझल आढळतात... अगदी रोजचे जगणे आहे , बाईच्या व्यथा आहेत अनुभवांचे चटके आहेत, ऐतिहासिक दाखले आहेत,पशु पक्षी निसर्ग आहे, लेक आहे, सखी आहे..... सर्वार्थाने परिपूर्ण असा हा गझल संग्रह आहे. अगदी थोडक्यात मांडायचे खरेतर शक्यच नाही कारण प्रत्येक गझल जगण्याचा एक नवा आयाम घेऊन आपल्यापुढे उभी असते.
नको तिथे अन् नको तेव्हढ्या गप्पा मारत बसते हे जग
याच्या त्याच्या डोक्यावरती टपल्या मारत बसते हे जग
अगदी रोजच्या जगण्यातल्या अनुभव आहे नाही का!किती सुंदर पकडतात माई अनुभवांना...मला नेहमीच वाटतं माईंचे शेर म्हणजे तळहातावर बसलेलं सुंदर, नाजूक फुलपाखरू आहे... खयाल मनात सोडून चपळाईने उडून जातं.
"गाभुळलेली चिंच वाटते तुझी आठवण"
चाफा हिरवाकंच वाटते तुझी आठवण"
आठवण किती ही सुंदर ! प्रत्येकाला वेगळ्याच काळात नेणारी... ह्या आठवणी म्हणजे आयुष्यभराची सोबत असते... त्यांना विसरता येतं नाही.
जगाचे सोड, हृदयाला फसवता येत असते का?
असे विसरायचे म्हणुनि विसरता येत असते का?
आ. माईंच्या गझलांमध्ये विषयांची मुळीच कमी नाही.निसर्ग, नदी, वड, चंद्र चांदण्या, झाडे अश्या निसर्गातील विविध छटा मांडत असतानाच वेदना , दुःख , अनुभव देखील तितक्याच प्रभावीपणे मांडत जातात.
"हाही गेला तोही गेला लोक चालले काळाआड"
"पानगळीला सोसत बसले विश्वाचे हे अबोल झाड"
संग्रहातील गझलांचे काही विषय थक्क करणारे आहेत... कुणी ह्याही विषयावर इतकी आशयसंपन्न गझल लिहू शकतो ह्याची कल्पनाच केलेली नसते. जसे काजळ, कोंबडा, शेजारीण ह्या गझल ... आता पसारा हा विषय पहा...
वाढला इतका पसारा लावताही येत नाही
टाकताही येत नाही फेकताही येत नाही
संग्रहातील काही गझल सखी ह्या विषयावर प्रभावीपणे भाष्य करतात. लेक/मुलगी हाही विषय बऱ्याच शेरात हळवेपणाने मांडला आहे.
लेक असते कृपाळू भुई सारखी
लाजऱ्या फुलासमान टवटवीत ह्या मुली
जा मुली सुखाने तू आपल्या घरी आता
ठेवला दगड आहे काळजावरी आता
लेक जशी गझलेत डोकावते तशी तिची काळजीही डोकावते.. मग आ. माई म्हणतात..
दुनिया जनावरांची वागायचे कसे?
सौंदर्य लाभलेले लपवायचे कसे?
ऐतिहासिक कथांचे दाखले देणाऱ्या काही गझल/काही शेर गहन विचार करायला भाग पाडतात... जसे..
"रोज वेगळा रावण दिसतो छळ सीतेचा टळतच नाही"
"दर दसऱ्याला जरी जाळला रावण काही मरतच नाही"
कांचनमृग हा हवा वाटतो , म्हणे जानकी चोळीसाठी
जन्मच अवघा पणास लागे, मुखातल्या या ओळीसाठी
दुःख हा विषय तर गझलेचा आत्मा आहे असे मी म्हणेन... मात्र दुःखाकडे पाहण्याची एक प्रगल्भ दृष्टी आ. माई आपल्या गझलेतून देऊन जातात.
डोळ्यामधले सागरपाणी भरकटलेले
जग दिसते हे जिकडे तिकडे कडवटलेले
एका आगळ्या गझलेचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो आहे... तुला सगळे समजते अन् मला काही कळत नाही. प्रत्येक शेरातील अखेरचे शब्द गुंफून पुढील शेर रचला आहे... जणू शेरांच्या साखळ्या बांधून सुरेख गुंफलेला गोफ असावा...👍😊 आणिक एक वेगळी गझल म्हणून ..झोपडीमध्ये कुडाच्या राहण्याचे कसब होते ह्या गझलेचा मी आवर्जून उल्लेख करेन...शेंगदाणे मूठभर अन् ओंजळी इतकेच पाणी
फक्त इतक्या इंधनावर राबण्याचे कसब होते
खरेच टोकाच्या गरिबीतही समाधानाने राहणे म्हणजे कसब होते.
काही गझल आयुष्याचे तत्वज्ञान मांडत जातात...
आश्चर्य हे असेही घडते कधी कधी
जगणे मुठीत सगळे असते कधीकधी
मात्र असे जीवनाचे खोल रहस्य मांडतानाही इतक्या सहज सुंदरपणे त्या मांडतात की चटकन तोंडातून वाह! अशी दाद निघाल्याखेरीज राहत नाही. वानगी दाखल त्यांच्या गझलेचा एक मतला आणि एक शेर देते
कुठून आलो समजत नाही,कुठे जायचे पत्ता नाही
जन्मावरती ताबा नाही मरणावरती सत्ता नाही
सगळी पाने हाती आली असे वाटले होते केवळ
हातामधुनी डाव जातसे हुकुमाचा तर पत्ता नाही
ह्यासारख्या कित्येक सुंदर गझल असणारा उर्मिला हा संग्रह जरूर वाचावा असाच👍आहे
प्रत्येक गझल रसिकाच्या संग्रहात जरूर असावा असाच हा अनमोल ठेवा.
आ. माई आपल्या गझल संग्रहास खूप खूप शुभेच्छा!💐🙏🏻🙇🏻♀
✒️ यशश्री रहाळकर
नाशिक
0 Comments