Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

गझल काव्यप्रकार sadanand dabir

                     गझल काव्यप्रकार

गझल काव्यप्रकार
Sadanand Dabir

    नमस्कार मित्र हो ,

 ह्यावेळी दोन विषयांना स्पर्श करायचे मनात आहे आणि तसे ते परस्पर संबंधितही आहेत.

पहिला म्हणजे गीत/गजल ह्या काव्य प्रकाराची

समीक्षकाकडून उपेक्षा व सर्व महत्वाच्या पुरस्कारांसाठी गजलसंग्रह बेदखल करणे.


    छंदा वृत्तातली कविता व ती लिहिणारे कवी ह्या आणि गजलकार कवींनी एकत्र येऊन आवाज उठवावा....पण ते कसे व्हायचे?


  दुसरा ह्यातूनच निघणारा विषय म्हणजे मराठी गजलेत माजलेली उस्तादी.


जरा दोन चार गजला लिहिल्या न लिहिल्या मराठी गजलकार उस्तादी करायला सरसावतात.काही तर अनाहूतपणेइतरांना इस्लाह करण्याची जुर्रत करतात.ह्यावर डाॅ.राम पंडितांचे परखड भाष्य आणि ह्याच विषयावरची एक हजल.


. भाग१


गेय कविता,गजल ह्या काव्यप्रकारांची उपेक्षा!


१.अगदी अल्प अपवाद वगळता गेय कविता/गजल यांकडे समीक्षक वळले नाहीत.कदाचित प्रासादिक आणि "ये हृदयींचे ते हृदयी" जाणा-या काव्यावर त्यांना,अनाकलनीय पण विद्वत्तापूर्ण भाषेत,कवीलाही अपेक्षित नसलेले अन्वयार्थ लावून दाखवत चमकोगिरी करता येत नाही...हेही एक कारण असू शकेल!


२.आजही राज्य साहित्य पुरस्कारासाठी, साहित्य अकादमी पुरस्कारासाठी व अन्य महत्वाच्या पुरस्कारासाठी,गेय कविता/गजल ह्यांचा विचार होत नाही.कारण कुठल्याही प्राध्यापक-समीक्षकाने त्यावर विद्वत्तापूर्ण लिहिलेले नसते.गद्यप्राय नीरस कविताच पुरस्कारासाठी योग्य ठरवली जाते.


३.मला अजून एका गोष्टीचे कोडे उलगडले नाही ते म्हणजे जाॅनर किंवा जाॅन्र जो काही उच्चार असेल तो.


ब-याच प्रा./डाॅ.समीक्षक मंडळींच्या मते गीत/गजलचे जाॅनर वेगळे आहे.कवितेचे जाॅनर वेगळे आहे. मी जेव्हा त्यांच्या निदर्शनास आणून दिले की, हिंदी,उर्दू, व गुजराती या तिन्ही भाषांचे साहित्य अकादमी पुरस्कृत संग्रह बघा,त्यात निम्म्या गजला/गेय कविता असतात.या तीन भाषांमध्ये जर गजल,गीतांचे जाॅनर वेगळे मानले जात नाही तर मराठीतच वेगळे जाॅनर का? या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळत नाही.


४.जर सगळे मराठी गजलकार (व छंदोबद्ध कविता लिहिणारे कवीही) एकत्र आले व राज्य सरकार, साहित्य अकादमी इ.ठिकाणी या प्रकारा विरुद्ध आवाज उठवला तर ही परिस्थिती बदलणे अवघड नाही! पण......

५. मित्रहो,हा "पण" पार करणेच अवघड आहे. कारण एकमेकांच्या चुका काढण्यातच दंग असलेले,आपल्या स्वतःलाच गजल समजते अशा गोड गैरसमजात मश्गूल झालेले, सुरेश भटांनंतर मराठी गजलची जबाबदारी(?) आपल्याकडेच आली,असे मानणारे गजलकार एकत्र येतील? माझ्या हयातीत हे शक्य होईल असे वाटत नाही.


. भाग.२


. अनाहूत इस्लाह आणि उस्तादी


 "कविता ही कवीने रसिकांसाठी लिहिलेली असते,कवीला आपल्या रचनेवर त्यांच्याकडून दाद हवीअसली तरी, तिचे रचनास्वत्व हे कवीचेच असते.कवीने न मागता त्यावर समीक्षक, वाचक वा श्रोत्याला इस्लाह करण्याचा यत्किंचितही अधिकार नाही.खाजगीत कदाचित शक्य असेल पण तेही व्यक्तिगत संबंधांवर अवलंबून आहे.सार्वजनिकरित्या तर अनाहुतपणे इस्लाह न मागता करणे हे एक तर आपले पांडित्यप्रदर्शन करण्याचा हव्यास किंवा पूर्व वैमनस्याची परतफेड म्हणावी लागेल. हे दृष्य कविता,कथा प्रांतात नाही ....पण गजल क्षेत्रात प्रकर्षाने जाणवते. याला कारण तगज्जुलपेक्षा तंत्राबाबतची फाजील जागरुकता होय. उस्ताद ही संकल्पना गजल काव्य प्रांतात आता बाद ठरवावी.लिखीत मार्गदर्शिकेद्वारे छंद,तंत्र शिकून मूलतः कवी असलेली व्यक्ती उत्तम गजलकार बनू शकते.


●ह्याचा अर्थ वाचकाने अभिप्रायच देऊ नये असे नाही. चांगला/वाईट स्पष्ट अभिप्राय देणे हा वाचकाचा अधिकार आहे व कर्तव्यही.कटाक्ष आहे तो अनाहूत इस्लाह करण्यावर."


डाॅ.राम पंडित ( 2003 मधील लेखातून)


●वरील मत हे डाॅ.राम पंडितांचे असून त्यांनी अकोल्याला २००३ साली झालेल्या गजल कार्यशाळेतील भाषणात सांगितले होते.ते तिथल्या दैनिकात प्रकाशित झाले होते,व यथावकाश एका कविताविषयक मासिकातही (बहुधा कविताश्री) प्रसिद्ध झाले होते.त्यांनी ह्या मताची पुष्टी केली असून,आपण त्यानंतरही काही लेखात हे प्रतिपादन केले असल्याचे सांगितले.

●हा विषय संवेदनशील आहे,पण ग्रुपवरील सर्वच सभासदांना मार्गदर्शक आहे.डाॅ.राम पंडितांना,दाखवून,त्यांच्या अनुमतीनेच मी हे गजलच्या समूहावर १६ जून२०२० रोजी टाकले होते.आज जवळपास तीन वर्षांनी पुन्हा गझलमंथन द्वारे प्रकाशित करत आहे.

. गजलतंत्राच्या आणि भाषाशुद्धीच्या/व्याकरणाच्या बारीकसारीक चुकाच काढणा-या मराठी गजलच्या "तज्ज्ञ" मंडळीना,आदरपूर्वक समर्पित.

        

. तो म्हणाला,'चूक आहे!'....(हजल)


तो म्हणाला, 'चूक आहे!',मी म्हणालो,'तू बरोबर!'

पूर्व,तू म्हणशील ती,रे! तूच गजलेतील खावर


खूप तू अभ्यास केला,तूच ज्ञानाचे सरोवर,

सांग रे पण,ह्या चुकांनी,काय कोसळणार,अंबर?


तू स्वयंभू,तू कशाला,रेघ दुस-याची पुसावी?

रेघ मोठी ओढ मित्रा,ही शुभेच्छा,तुज,खरोखर!


काळजी वाटे तुझी की,पित्त वाढुन त्रास होइल!

अजुन नाही वेळ गेली,म्हणुन म्हणतो,"यार,सावर!"


कृष्ण सुद्धा थांबला रे,सोडण्या आधी सुदर्शन, 

कर हवा तर वध 'शिशूचा'*ह्या चुका होताच शंभर!


शुद्धतेच्या आग्रहाची,व्हायची दहशत अशाने,

कल्पनांच्या भ्रूणहत्या,कबर त्यावर शुभ्र सुंदर!


                 

. ● सदानंद डबीर 9819178420



ख़ावर- (शब्दकोश)-फारसी, पूर्व;पश्चिम (दोन्ही अर्थांनी वापर

ला जातो.)


शिशू--शिशूपाल


.(पौराणिक संदर्भ.शिशुपालाचे शंभर अपराध झाल्यावर कृष्णाने त्याचा वध केला.)


            ¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤ 




Post a Comment

0 Comments