🌸 पुस्तक परिचय 🌸
दुथडी भरून वाहणारी
‘गझलगंगा’
गझल म्हणजे कागदावर उतरलेले नुसतेच शेर नसतात, गझल म्हणजे काळजावर कोरलेले शेर असतात. गझल म्हणजे नुसते अलंकारिक शब्द नव्हेत. गझल म्हणजे हृदयातून वाहणारी ‘गझलगंगा’ असते. जीवनातील सुख-दुःखाचे कैक प्रवाह त्यातून वाहत असतात. गझलकाराचे हृदय वाहती वेदना असते. वेदना वाहती असली तर भाव-भावनांचे नानाविध पैलू रुंदावत जातात. या पैलूंचे प्रवाहित होणे म्हणजे ‘गझलगंगा’ होय. प्रतिथयश गझलकार सिराज शिकलगार यांची ‘गझलगंगा’ आशय-विषयांनी दुथडी भरून वाहते आहे. तिला काठावरच्या सुखदुःखांची जाणीव आहे. सिराजभाई यांचा चौदावा ‘गझलगंगा’ हा संग्रह नुकताच प्रकाशित झाला आह. त्यातून उसळणाऱ्या लाटांनी रसिकजन चिंब भिजून जातात. प्रणय (इष्क) हाच विषय गझलांचा प्रधान विषय आहे. अशी एक पूर्वापार समजूत आहे. परंतू सिराजभाई यांची ‘गझलगंगा’ विषयांचे वैविध्य अंतरात घेऊन निरनिराळ्या वळणांनी वाहत आहे. जन सामान्यांच्या जीवन मरणाच्या प्रश्नांना त्यांनी गझलांमधून प्रवाहित केले आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून त्याचे भरभरून स्वागत होणे क्रमप्राप्त ठरते.
सिराजभाई यांची जडणघडण म्हणजे कोणासही विचार करायला भाग पाडणारी,
नवोदितांना प्रेरणा देणारी आणि गझल वाड़मयात भरीव योगदान देणारी यशस्वी ‘गझलगाथा’ आहे. असे म्हटल्यास ते मुळीच वावगे ठरणार नाही. त्याचे कारण असे की,
सिराजभाई हे गाववजा छोट्याशा खेड्यात राहणारे रहिवासी आहेत. त्यांना घराण्यातील
अक्षरांचा अक्षय वारसा लाभलेला नाही. त्यांना अक्षरबळ देणारा कुणी मातब्बर गुरु नाही.
म्हणून त्यांचा गझलप्रवास सहजसोपा नव्हता. अनेक खडतर वाटा-वळणांनी त्यांचा प्रवास होत राहिला. पण ते अवसान गाळून बसले नाहीत. हिमतीने, हिकमतीने त्यांनी हा गझल प्रवास सुकर करून दाखविला इतकेच नव्हे तर या प्रवासातील सर्वोच्चे शिखर काबीज केले. मुळात गझल लिहिणे हे एक अत्यंत अवघड, गणितीय काम आहे. गझल म्हणजे पझल आहे. एक अग्निदिव्य आहे. जे या दिव्याला धरण्याचा प्रयत्न करतात त्यांचे हात जळून जातात मात्र या अगिदिव्यातून पार पडलेले सिराजभाई हे बावनकशी सोन्यासारखे गझलकार आहेत. ‘एकला चलो रे’ म्हणत सुरु झालेला त्यांचा गझल प्रवास त्यांच्या एकट्याचे श्रेय आहे, स्वकर्तृत्व आहे. हे त्यांच्या जिद्दीचे, कष्टाचे, निष्ठेचे, साधनचे क्षमतेचे फळ आहे. सभोवताली कोळशाचे ढीग असले तरी त्यातून हिकमतीने यशाची माणके वेचण्याची वेचक, वेधक दृष्टी त्यांच्यापाशी आहे. याचा प्रत्यय त्यांच्या शेरातून वाचकांना येतो----
कोळशाचे ढीग होते भोवताली
हिकमतीने माणके वेचली यशाची
शब्द म्हणजे सिराजभाई यांचा जीव की प्राण ! त्यांचा जीव तिन्ही त्रिकाळ शब्दात गुंतलेला असतो. ते सरसकट भरमसाठ, खोगीर भरतीचे शब्द स्वीकारत नाहीत. शब्दांच्या निवडीबाबत ते पराकोटीचे चौकस आहेत. घासून पुसून नेमका, अर्थ प्रवाही शब्द ते निवडतात. त्यांनी गझलेत योजलेल्या रदीफ-काफियांवरून याची कल्पना येऊ शकते. तापलेल्या लोखंडावर घाव घालून ज्याप्रमाणे लोहार धारधार तलवार तयार करतो. त्याचप्रमाणे ते शब्दाला घासून धार देतात. गझलेत ज्याचें शब्द लखलखत्या पात्याप्रमाणे येतात. उदाहरणार्थ-------
असा काढतो शब्द घासून
जशी एक तलवार लोहार
माणसाचा माणसावर भरवसा राहिलेला नाही. तो दिवसेंदिवस नाहीसा होत चालला आहे. जिवंत माणसापेक्षा निर्जीव कुलुपावर त्याची अधिक भिस्त असते. माणसाविषयीच माणसात अंतरंगात काहीतरी काळेबारे असते. त्याच्या मनात संशय कल्लोळ सुरु असतो. तो घरातून बाहेर पडताना खोली रिकामी असली तरी तो दाराला कुलून लावून जातो. माणसावरील भरवश्यापेक्षा त्याला कुलुपाचा मोठा दिलासा वाटत असतो. माणसाच्या या गैरविश्वासावर, संशयावर सिराजभाई लिहितात---------
मोकळ्या खोलीस टाळे फार झाले
अंतरंगी भाव काळे फार झाले
वास्तविक जीवन रुक्ष नाही तर ते रुचकर आहे. त्यासाठी अभिरुची असणे गरजेचे असते. पण माणूस सतत स्वतःला संशयाच्या जोखडात कोंडून घेतो. माणूस मनात काही तरी लपवूनच दुसऱ्यांशी वागत बोलत राहतो. अनाठायी संशय, किंतू मनाची कवाडे बंद करून टाकतात. मग मोकळा संवाद घडणे कसे शक्य आहे. पारदर्शकतेच्या अभावी तो
जीवनाची मजा लुटू शकत नाही. जीवन ही सुगंधाची बाग आहे. पण मनातली संशयाची
वल्ली त्याला त्याचा सुगंध हुंगू देत नाही. माणसाच्या वावरण्यात मोकळेपणा हवा. स्वभावात रसिकता हवी, लोकांना आनंद वाटण्याची वृत्ती हवी. जीवनातील बागेच्या गंधाने सुगंधित होता आले पाहिजे. यासाठी वागण्यातील पारदर्शकता महत्वाची ठरते.
जीवनाचे मोल विशद करणारा हा शेर पहा ------
पारदर्शी वाग वेड्या घे मजा तू जीवनाची
फार नाही रुक्ष जीवन ही सुगंधी बाग आहे
संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे. परंतु अलीकडच्या काळात याची पाशवी बहुमताच्या बळावर गळचेपी करण्यात येत आहे. कवी-लेखकांनी काय लिहावे, कसे अभिव्यक्त व्हावे हे आता यंत्रणा ठरवत आहे. एखाद्या लेखकाने व्यवस्थेतील अनागोंदीवर बोट ठेवले तर त्याच्यावर लगेच चाप लावण्यात येतो. अनेक पातळ्यांवरून त्याची कोंडी करून त्याचे जगणे मुश्कील करून टाकण्यात येते. कित्येकांनी त्यांना मिळालेले सरकारी पुरस्कार परत केल्याची अनेक उदाहरणे आहेत. साहित्यिकांवर अशी हुकूमत गाजविणे, त्यांची मुस्कटदाबी करणे म्हणेज संविधानाच्या मूळ तत्वाला गालबोट लावण्यासारखेच आहे. अशी स्पष्ट भूमिका घ्यायला ही सिराजभाई कचरत नाहीत---
व्यक्त होणे जाहले मुश्कील आता
बहुमताने लावलेला चाप आहे
बेगडी आणि बोगसपणाचा शिरकाव आजकाल बऱ्याच क्षेत्रात झाल्याचे प्रकर्षाने दिसून येते. बोगस पात्रतेचा एवढा बोलबोला वाढलेला आहे की कमजोरही आता विक्रांत भासतो आहे. भूलभुलैयाच्या या खेळात कुणीच मागे नाही. यात खऱ्या पात्र असणाऱ्याचा बळी दिला जातो. वाम मार्गाचा अवलंब करणाऱ्यांविषयी ब्रदेखील उच्चारण्यात येत नाही. अशा तथाकथित विक्रांत वीरामुळे समाजाला काय फायदा होतो. ही समाज स्वास्थला लागलेली कडी आहे असे ही सिराजभाई यांना वाटते---------
पात्रतेचा बोलबाला एवढा की
भासतो कमजोर ही विक्रांत आता
सिराजभाई यांचे उपरोक्त काही शेर वानगी दाखल घेण्यात आले आहेत. स्वानुभवातून त्यांनी केलेली निर्भय मांडणी आणि सोशीक माणसांच्या व्यथा वेदनांना त्यांनी प्राधान्याने वाट मोकळी करून दिली आहे. सामाजिक भान जागृत असलेले ते गझलकार आहेत. खडकाळ जमिनीतही त्या जाणिवा ते इतक्या प्रेमाने रुजवतात, त्याची उगवण क्षमता शंभर टक्के असते. उत्कट प्रतिभेतून अविष्कृत झालेल्या गझलाच काळाच्या कसोटीवर उतरतात. चिरकाल टिकतात. सिराजभाई यांनी प्रवाहित केलेली ‘गझलगंगा’ रसिकांचे
भावजीवन सचितच समृध्द करणारी ठरेल. हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
गझल गंगा: गझलसंग्रह
गझलकार: सिराज शिकलगार
प्रकाशक: अक्षरशिल्प प्रकाशन, अमरावती
पृष्ठे: ९६ मूल्य:२००/-₹
बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर सोलापुरी)
0 Comments