Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

धर्मशाळा Gazalkar Sabir Solapuri

 पुस्तक परिचय 



माणसाला आरसा दाखविणारी

‘धर्मशाळा’


     म. भा. चव्हाण हे उत्तम गझलकार आहेत. सुरेश भट यांनी पुण्यातून सुरू केलेली गझलेची चळवळ त्यांनी खूप जवळून पाहिली. अनुभवली. जगली. त्या चळवळीत त्यांचा लिहिता सहभाग होता. भटांच्या निवडक शिष्यांपैकी हे एक होत. उत्कृष्ट गझल लेखन करणे आणि मैफली गाजविण्यात मभाचा मोठा हातखंडा होता. अद्यापही त्यात खंड पडलेला नाही. आजही त्यांनी गझलसेवा तितक्याच निष्ठेने सुरू आहे. म. भा. हे उत्साहाने तुडुंब भरलेले सदाबहार गझलकार आहेत. अष्टाक्षरी छंदातील ‘धर्मशाळा’ या त्यांच्या कवितासंग्रहाची पाचवी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. एखाद्या काव्यसंग्रहाच्या पाच आवृत्ती निघाव्यात ही फार अपूर्वाईची गोष्ट आहे. यावरूनच धर्मशाळेला वाचकांचा मिळणारा उदंड प्रतिसाद सहज लक्षात येतो. गझल लिहिणारा आधी उत्तम कवी असला पाहिजे, ही गझलेची पूर्व अट आहे. असे सुरेश भट नेहमी सांगत असत. इथे तर कविता लिहिणाराच आधी उत्तम गझलकार आहे. त्यामुळेच त्यांच्या कवितांचा दर्जाही तितक्याच तोलामोलाचा आहे.

     ‘धर्मशाळा’ हा मभा यांच्या अद्भुत प्रतिभेचा अचंबित करणारा आगळावेगळा आविष्कार आहे. ज्याप्रमाणे शेरातून एका संपूर्ण कवितेचा प्रत्यय रसिकास येतो. तद्वतच अष्टाक्षरीच्या एकेक चरणातून एका परिपूर्ण कवितेचा आस्वाद घेता येतो. या संग्रहात एकूण ३०६ चरणांची विषयनिहाय मांडणी करण्यात आली आहे. ही मांडणी सरळसोट पद्यात्मक नाही तर त्याला काव्याचा वेगवेगळा आयाम देण्यात आला आहे. या मांडणीत प्रासादिकचा आणि विचारात सुस्पष्टता असल्या कारणाने प्रत्येक चरण आशयाचे आकाश उजळत जाते. एकेक विषय आशयाच्या कसोटीला ताकदीने भिडत जातो. त्यात चमकृती, कलाटणी,  विरोधाभास, यमकांचे तंतोतंत योजन, कल्पनेची उत्तुंगता, जीवनानुभवांची नेमकी पेरणी ही सगळी गुण वैशिष्ट्ये चरणा-चरणातून प्रकट होत जातात. यातील काही चरण अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाच्या अंगाने जाणारे आहेत. तर काही चरण मराठमोळा अस्सल ग्रामीण बाज आणि साज लेवून येतात. समृद्ध शब्दसंपदा आणि भाषेवर असलेली त्यांची पक्की मांड पाहून आश्चर्यचकित व्हायला होते. प्रभावीपणे अभिव्यक्त होण्याची शब्दकळा मभापाशी आहे. ही शब्दकळा काही आभाळातून एकदम अवतरत नाही ती नियमित व्यासंगातून परिश्रमपूर्वक कमवावी लागते. ‘धर्मशाळा’ हा त्यांच्यातील उत्कट काव्याचे चौफेर दर्शन घडविणारा त्यांच्या प्रतिभेचा लौकिक वाढविणारा काव्यसंग्रह आहे.

     ऐन बहराच्या काळात मभाच्या वाट्याला पानगळ आली. अनेक वणवे त्यांना झेलावे लागले. पण त्यांचे उमलणे, फुलणे आणि बहरणे काही थांबले नाही. शक्यतांचे नवनवे आकाश ते कवेत घेत राहिले. धर्मशाळेच्या मुक्कामी काही प्रसन्न-खिन्न, सुखी-दुःखी, खुशालचेंडू-चितांक्रांत प्रामाणिक-दांभिक, शोषक-सोशीक, भोळसट-धूर्त अशा नाना प्रकारच्या वृत्ती-प्रवृत्तींचे लोक भेटत राहतात. त्यातून जगण्याचे विविध पैलू समोर येतात. कोणत्याही संवेदनशील मनाला काळजी वाटावी, अशा भीतिदायक कालखंडातून आपण जात आहोत. सभोवताली कुट्ट काळोख वाढत चालला आहे. नीतिमूल्यांचा ऱ्हास होऊ लागला आहे. अध:पतनाकडे माणूस बेफाम धावत सुटला आहे. कुणालाही भीती आणि नीती राहिलेली नाही. अशा पार्श्वभूमीवर ही ‘धर्मशाळा’ माणसाला स्वतःकडे आणि जगाकडे बघण्याची सहजदृष्टी देते. नीतिमूल्यांचे धडे देते. जीवनातील उदात्तता, शुभ्रता, मंगल्य कशात आहे, हे सार रूपाने सांगते.


     कविता लिहिणे हे सगळ्यात सोपे काम आहे. कमी कष्टात विनासायास हे काम करता येते आणि प्रसिद्धी मिळविता येते. असे अनेकांना वाटत राहते. पण कविता लिहिणे हे सर्वात अवघड आणि जिकरीचे काम आहे. आशयपूर्ण कविता लिहिण्यासाठी दीर्घकालीन भावनिक गुंतवणूक करावी लागते. तिचा सतत ध्यास घ्यावा लागतो. कित्येकदा कवितेचे शिवधनुष्य पेलताना आयुष्य राख रांगोळी होण्याची शक्यता असते. एकेक अक्षरांसाठी आयुष्याची आहुती द्यावी लागते. ज्याची अशी मनाची तयारी असते त्यालाच कविता खऱ्या अर्थाने वश होते. त्याच्याच कवितेचा गंगा-भागीरथी होते. आणि आयुष्य समृद्ध संपन्न होते. याची जाणीव मभाना आहे. ते म्हणतात. 


अक्षरांना आयुष्याची

द्यावी लागते आहुती

तेव्हा कुठे कवितेची

होते गंगा-भागीरथी


     भ्रष्टाचार, लाजखोरी हा आपल्या देशाला लागलेली कीड आहे. ही कीड सारे समाजजीवन पोखरत चालली आहे. यंत्रणा कितीही सजग असो लाचखोर कशाही तऱ्हेने लाज घेतातच. पैसे खातातच. याला कोणतेच धरबंद राहिलेले नाही. याच्यावर कुणीच आळा घालू शकत नाही. पैसे खाण्याच्याही अजब तऱ्हा असतात. वंचितांच्या हक्कासाठी भांडणारे लोकसुद्धा भिकाऱ्यांच्या भिकेतला अर्धा वाटा स्वतःच्या खिशात टाकतात. इतकेच नव्हे तर हवामानाचा अंदाज हवेलाच विकतात. याकडेही मभा लक्ष वेधतात. 


पैसे खाणारी माणसे

पैसे कसेही खातात

हवामानाचा अंदाज

हवेलाच विकतात


     ज्याला फक्त चोऱ्यामाऱ्या करूनच जगायचे असते. त्याने भुरट्या चोऱ्या करणाच्या फंदात पडू नये  चोरीचे उद्दिष्टही व्यापक असले पाहिजे. जे पुरून उरले पाहिजे. अशी चोरी करण्यातच खरी श्रीमंती आहे. चोराला मभा असा सल्ला देतात की. 


त्याला काही चोरायाचे

त्यांने समुद्र चोरावा

नदी काठचा एकांत

घरी उचलून न्यावा


     नातेवाईक हे  तऱ्हेवाईक असतात. नातेवाईकांना कितीही जीवापाड जपले तरी कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच राहते. कृतज्ञ राहण्याऐवजी ते कृतघ्नच होतात. पक्के संधी साधू असतात. त्यासाठी तुम्ही जीवाचे रान करा, त्यांची कितीही सरबराई करा. ते कधीही आभार मानत नाहीत. उलट तुमच्या पाहुणचारातील उणिवा शोधत बसतात. अशा उतानखाट नातेवाईकांची खाट मभा मार्मिक शब्दात उभी करतात. 


माझ्या कातड्यांचे जोडे

त्यांच्या पायी मी घातले

तरी बोलतात साले

‘नाही काकडे चांगले..!’


     अशा प्रकारच्या एकेकं चरणातून मभाच्या प्रत्ययकारी टिपणीने वाचक अंतर्मुख होत जातात.  अष्टकारी छंदातला हा अनोखा प्रयोग आहे. या धर्मशाळेला व. पु. काळे यांची प्रस्तावना लाभली आहे. ही प्रस्तावना वपुंनी पारंपरिक पद्धतीने न लिहिता अतिशय भारावून जावून त्यांच्या पद्धतीने लिहून त्याला वेगळे परिणाम दिले आहे. प्रत्येक तुकड्यातील दृश्य-अदृश्य पात्राशी मनमोकळ्या गप्पा करत त्यांना बोलते करण्याचे काम केले आहे. कवीला असंख्य भलेभुरे अनुभव येत असतात. परंतु सगळेच अनुभव एकाच संग्रहातून बांधता येत नाहीत. काही सांगण्यासारखे राहूनच जाते. वपुंनी कवीचे मनोगतही उलघडण्याचा प्रयत्न केला आहे. तो कितपत यशस्वी झाला आहे. हे वाचण्यासारखे आहे. 


धर्मशाळा: कवितासंग्रह

कवी: म. भा. चव्हाण

पृथ्वीराज प्रकाशन, पुणे

पृष्ठे: १०४ मूल्य: २५०₹




बदीऊज्जमा बिराजदार

(साबिर सोलापुरी)

भ्रमणध्वनी: ९८९०१७१७०३

Post a Comment

0 Comments