🌸 पुस्तक परिचय 🌸
मराठी गझल : १९२० ते १९८५
'मराठी गझल : १९२० ते १९८५' -- मराठी गझलेच्या जडणघडणीचा इतिहास सांगणारा ग्रंथ
आद्य मराठी गझलसंशोधक आणि ज्येष्ठ गझलकार डाॅ. अविनाश सांगोलेकर यांच्या 'मराठी गझल : १९२० ते १९८५' या संशोधननिष्ठ समीक्षाग्रंथाचा परिचय व परीक्षण
( भाग २ )
----------------------------------------
आद्य मराठी गझलसंशोधक, ज्येष्ठ मराठी गझलकार डाॅ. अविनाश सांगोलेकर यांचा परिचय, त्यांचे मराठी गझलक्षेत्रातील संशोधन कार्य व हे कार्य हाती घेण्यामागची पार्श्वभूमी, तसेच त्या वेळची परिस्थिती यांची थोडक्यात माहिती आपण लेखाच्या पहिल्या भागात घेतली. 'मराठी गझल : १९२० ते १९८५' या ग्रंथाच्या अंतरंगाविषयीचा आढावा लेखाच्या या भागात म्हणजेच भाग - २ मध्ये घेऊयात.
डाॅ. अविनाश सांगोलेकर यांनी 'मराठी गझल:उगम व विकास'(प्रारंभ ते १९२०) या विषयावर एम.फिल.ही संशोधनपदवी १९८४ मध्ये प्राप्त केल्यानंतर त्यांचे गझलक्षेत्रातील गुरू गझलसम्राट सुरेश भट(नागपूर ) आणि उर्दू,तसेच मराठी गझलेचे मर्मज्ञ डाॅ.सुरेशचंद्र नाडकर्णी (पुणे) या दोघांनी 'मराठी गझल' या विषयावर अधिक संशोधन आणि समीक्षा करण्याची सूचना केली.ती 'गुरूंची आज्ञा' समजून डॉ.सांगोलेकरांनी या कामात स्वत:ला असे झोकून घेतले की, नवीन गझल लिहावी, स्वत:चा गझलसंग्रह काढावा,हा अधूनमधून त्यांच्या मनात येणारा विचारही त्यांनी निग्रहाने बाजूला ठेवला.पीएच.डी.ही संशोधनपदवी त्यांना १९९१ मध्ये प्राप्त झाल्यावर मग त्यातून त्यांनी सिद्ध केलेला 'मराठी गझल:१९२० ते १९८५' हा त्यांचा संशोधननिष्ठ समीक्षाग्रंथ १९९५ मध्ये पुण्यात समारंभपूर्वक प्रकाशित झाला.
वरील पार्श्वभूमी असलेल्या या ग्रंथात एकूण सात प्रकरणे आहेत.पहिले प्रकरण हे गझलेची सर्वांगीण चर्चा करणारे आहे. गझल म्हणजे काय, गझलेची जागतिक वाटचाल कशी झाली, याबद्दलची तात्त्विक व ऐतिहासिक चर्चा या प्रकरणात आहे. 'गझल' या शब्दाचे मूळ 'घझिल्' ह्या अरबी शब्दात असून त्याचा अर्थ 'प्रेमालाप करणे' असा होतो. हा शब्द मराठीत सर्वप्रथम 'गज्जल' असा वापरला गेला, असे मत उपलब्ध माहिती व पुरावा यानुसार त्यांनी व्यक्त केले आहे. पुढे माधवराव पटवर्धन ( माधव जूलियन) यांनीही तो शब्द तसाच वापरला व प्रचलित केला. त्यानंतर डॉ.रा. शं. वाळिंबे यांनी देखील'गझल' असा शब्द वापरला. हेच रूप पुढे श्री. के. क्षीरसागर यांनी देखील वापरले. हरीण व गझल ह्यांचा संबंध दाखवणारी कल्पना फार्सीत आढळते. नाजूक भावनांचा आविष्कार करणारा काव्यप्रकार म्हणून 'गझल' हे नाव दिले गेले असावे, असे मत प्रा. डाॅ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी व्यक्त केले आहे. 'प्रणयगीत किंवा प्रेयसीस उद्देशून काढलेले उद्गार' असा 'गझल' या शब्दाचा वाच्यार्थ आहे, तर 'फार्सी वृत्तात लिहिलेले एकयमकी प्रेमगीत', 'काव्यातील एक विशिष्ट प्रकार', 'एक पद्यप्रकार', 'प्रेमपात्राशी गुजगोष्टी करणे व खेळणे', असे गझलेचे अनेक अर्थ सांगितले गेलेले आहेत.
गझल फार्सी भाषेतून उर्दूत आली, याबाबत डॉ .सांगोलेकर यांनी अनेक मते मांडली आहेत. मुसलमान लोक भारतात आले व त्यांच्याबरोबरच फार्सी भाषेतील गझलही भारतात आली आणि नंतर सूफी संतांच्या प्रार्थना गीतांच्या माध्यमातून ही फार्सी गझल संपूर्ण भारतभर पसरली.
गझल उर्दू भाषेतून हिंदी (आणि तिच्या अवधी,व्रज, भोजपुरी या बोलीभाषांमध्येदेखील), पंजाबी, गुजराती व मराठी या भारतीय भाषांमध्ये आली.
हिंदी भाषेत आधी गझलरचना ही खडी बोलीत झाली. पुढे हिंदी भाषेत जयशंकर प्रसाद, निराला, दिनकर व दुष्यंतकुमार यांनी गझला लिहिल्या. मराठीत पहिली गझल लिहिण्याचा प्रयत्न अमृतराय यांनी केला.नंतर पुढे त्यात टप्प्याटप्प्याने अधिक यश माधव जूलियन व त्यानंतर सुरेश भट यांना प्राप्त करता आले. मराठीत 'गझल' हा काव्यप्रकार परिचित करून देण्याचे,तो लोकप्रिय करण्याचे, रुजवण्याचे आणि वाढवण्याचे श्रेय माधव जूलियन व सुरेश भट यांनाच जाते, असे स्पष्ट मत या संशोधनग्रंथात डॉ .सांगोलेकर यांनी सप्रमाण मांडले आहे.
१९२० पूर्वीच्या मराठी गझलेतील शैथिल्य दूर करून तिला शास्त्रशुद्ध स्वरूप देण्याचे कार्य माधव जूलियन यांनी केले, तर सुरेश भट यांनी फार्सी - उर्दू गझलेचे तंत्र स्वीकारून त्यामधून खरीखुरी मराठमोळी गझल लिहिली,ती रुजवली, तसेच ती लोकप्रियही केली, असे स्पष्ट प्रतिपादन डाॅ.सांगोलेकर यांनी आपल्या संशोधनग्रंथात केले आहे.
गझलेच्या तंत्रात डॉ.सांगोलेकरांनी गझलेचे वृत्त, द्विपदी, द्विपदींची संख्या, द्विपदींची मांडणी, त्यांची गुंफण, द्विपदींचे स्वतंत्र अस्तित्व, पहिली द्विपदी म्हणजे मतला, शेवटची द्विपदी म्हणजे मक्ता, उपांत्ययमक म्हणजे काफिया व अंत्य यमक म्हणजे रदीफ यांची चर्चा केली आहे.
काही काव्यप्रकारांचे तंत्र ताठर व अपरिवर्तनीय असते. त्यात कवीला बदल करणे शक्य नसते. ह्या काव्यप्रकाराचे सौंदर्य व सामर्थ्य ह्या तंत्रावरच अवलंबून असते. अशा तंत्रप्रधान काव्य प्रकारांमध्ये 'गझल' हा काव्य प्रकार मोडतो. तंत्राबरोबरच 'गझल' हा वृत्तबद्ध काव्यप्रकारही आहे. वृत्ताला 'बहर' म्हणतात. ठराविक मात्रांच्या आवर्तनातून 'गझले'त तालबद्धता, गेयता, गती, लय, वजन, ऐट साधली जाते. शिवाय गझलेत केवळ दोन ओळींच्या द्विपदींमधून उत्कट, प्रभावी, अर्थपूर्ण आशय व्यक्त करावा लागतो.त्यामुळे कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त आशय व्यक्त कण्यासाठी कवीला दृष्टांत, म्हणी, रुपके,वाक्प्रचार, प्रतीके, प्रतिमा, संकेत, शब्दचमत्कृती, कल्पनाचमत्कृती, भावचमत्कृती यांचा वापर करावा लागतो.
अशा प्रकारे सर्व बारीक सारीक बाबींवर डॉ.सांगोलेकर यांनी आपल्या संशोधनग्रंथातून अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला आहे. कारण या सर्व गोष्टी गझल मुळापासून जाणून घ्यायची असेल तर अपेक्षित व आवश्यकही होते.
(क्रमश:)
----------------------------------------
पुस्तकाचे नाव : 'मराठी गझल : १९२० ते १९८५'
(संशोधननिष्ठ समीक्षाग्रंथ),
लेखक:डाॅ. अविनाश सांगोलेकर,
प्रकाशक : मिहाना पब्लिकेशन्स, पुणे
मुखपृष्ठ : राजेंद्र गिरधारी
पृष्ठसंख्या : २९८
किंमत : ३५० रुपये.
----------------------------------------
दिवाकर चौकेकर
गांधीनगर, (गुजरात)
0 Comments