Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

निव्वळ योगायोग Gazalkar Sabir Solapuri

            🌸 पुस्तक परिचय 🌸



🌷सर्वस्पर्शी अनुभूतीच्या गझला🌷


     झलेचा संवर्धन करणारं प्राजक्ता पटवर्धन हे गझलक्षेत्रातलं लक्षणीय नाव आहे. प्राजक्ताच्या नाजूक अंतःकरणाला त्याचं गझल सर्जन गेली अनेक वर्षे अखंडपणे सुरू आहे. त्यांच्या गझलेतील दरवळ रसिकांना सुखावणारा आहे.  प्राजक्त फुलांचा प्रसन्न सडा त्यांनी ‘निव्वळ योगायोग’ या गझल संग्रहातून शिंपला आहे. त्यात अनेकविध विषय, आशयाची मनमोहक पखरण झाली आहे. यात पहाटेचा सुखद गार वारा आहे. ग्रीष्माच्याही उंबरठ्यावर अलगद अवतरणारा श्रावण आहे. मनातले हिरवेपण कायम राखता आले की निसर्गातले विविध विभ्रम सतत साथसंगत करायला उत्सुक असतात. मूलतः कवीला निसर्ग हा सर्वाधिक जवळचा असतो. हा निव्वळ योगायोग ठरत नाही. हा आंतरिक ऋणानुबंध असतो. 

    या अगोदर ‘मौनांची आर्जवे’ हा प्राजक्ता पटवर्धन यांचा पहिला आशयसंपन्न गझलसंग्रह प्रकाशित झाला आहे. आता अकरा वर्षांनंतर ‘निव्वळ योगायोग’ हा दुसरा गझलसंग्रह ग्रंथयुग प्रकाशन तर्फे प्रकाशित झाला आहे. प्रस्तुत गझलसंग्रह त्यांच्या अभिव्यक्त होणाऱ्या लेखन शैलीतील आशयाच्या आकाशाकडे झेप घेणाऱ्या खायालातील,  सुसूत्र मांडणीतील वेगळेपणा घेऊन सिद्ध झाला आहे. गझल सर्जनाचा ध्यास कधी संपणारा नसतो. गझल ही एक अशी विधा आहे. जी पूर्णत्वाने कधी उमजेल, सापडेल हे सांगता येत नाही. त्यासाठी अहर्निश रियाज करावा लागतो. तरच उत्तम गझललेखन घडत जाते.  प्राजक्ता पटवर्धन याच कोटीतलं गझल सर्जन करणाऱ्या गझलकारा आहेत. हा गझलसंग्रह वाचताना आशय समृद्धीचा प्रत्यय येत राहतो. 


     गझल वांग्मयाच्या कक्षा दिवसेंदिवस रुंदावत चालल्या आहेत. हे सुचिन्ह आहे. प्रस्थापितांनी उत्कृष्ट गझल लेखनाचा प्रयत्न निर्विवादपणे केलेला दिसून येतो. पण तेवढ्यावरच समाधानी राहता येत नाही. गझल सर्जनाची प्रक्रिया ही निरंतर चालणारी आहे. कोणतीही उत्कृष्ट रचना एकमेव किंवा अंतिम नसते. नव्या खायालाची झेप या पलीकडेही असू शकते. नव्याने लिहिणाऱ्यांना अद्भुत आशयाचे आकाश खुणावत असते. म्हणून तर सातत्याने नवनिर्मिती घडत असते. स्वतःला सिद्ध करण्यासाठी फक्त नव्या दमाच्या निर्मिती निर्मिकांना संधी प्राप्त करून देण्याचा प्रश्न असतो. प्रस्थापितांच्या दाखल्यांनी ज्याच्या मनाची भूक भागत नाही, त्यांना स्वतःला सिद्ध करणे भाग्यच असते. नेमक्या याच आशयाचा शेर प्राजक्ता पटवर्धन लिहितात. नव्याने व्यक्त होण्यांची उमेद वाढविणारा हा शेर पाहा. 


सिद्ध करण्याला मलाही एक संधी दे जरा

दाखले प्रस्थापितांचे फक्त तू देऊ नको


     अस्सल प्रतिभेला फार काळ कोंडून, दाबून ठेवता येत नाही. वाट कितीही खडतर असली तरी ती स्वतःचा मार्ग काढते. पुढे सरसावते. सर्जनशीलतेचा नभ आभाळून येण्याचा फक्त अवकाश असतो. प्रतिभेचे प्रतिकात्मक रूप असलेला हा शेर. 


आभाळुनी नभ आले अन् मोहरले बघ तरु लगेचच

त्याला पाहून नाच नाचले फांदीवर पाखरू लगेचच


     आपल्या जीवनानुभवाशी इमान राखून त्यातून गझलांची मनभावन गुंफण करणाऱ्या या गझलकारा आपल्या गझलेतून साधेपणाने,  सीधेपणाने पण शब्द सामर्थ्याने, उत्कटतेने खयालांची सर्व स्पर्शी अभिव्यक्ती करतात. ही उत्कटाच हृदयाला खोलवर भिडणारी आहे. इश्किया  गझलेतील तरल नाजूक भावभावना आणि वेदनेची आर्तता प्रेमाचे उत्कट रूप  धारण करत त्यांच्या अनेक शेरांमधून येते. चपखल प्रतिमा, प्रतीकांतून गझलेचे सौंदर्य प्रकटते. तो कोमल प्राजक्तासारखी होत जाते. त्यांची गझल वाचकांशी गूजगोष्टी करत राहते. 


रोज काही गूजगोष्टी सांगते माझी गझल

आणि माझ्या अंतरीचे जाणते माझी गझल


     त्याच्या नुसत्या भेटीनेच मनाला पालवी फुटते. पण भेटीत नेमके काय होते, हे कळायला मार्ग उरत नाही. प्रेम जगतातील निरनिराळ्या भावछटा व त्या भावछटांच्या प्रतिबिंबाचे प्रत्ययकारी चित्रण प्राजक्ता पटवर्धन यांच्या गझलेचे खास आकर्षण आहे.  हा शेर याची साक्ष देतो. 


तुला मी भेटले अन् पालवी फुटली मनाला

कळेना नेमकेसे काय त्या भेटीत होते


     या गझलकाराच्या अविष्करणाचा आवाका मोठा आहे. आत्मभानाबरोबरच सामाजिक भान देखील त्यांनी जपले आहे. त्या जशा प्रेमभावना सुंदररीत्या मांडतात त्याच प्रमाणे गझल स्त्री जीवन जाणिवेची असो वा सामाजिक आशयाची,  त्या तितक्याच समरसतेने व्यक्त होतात. विषय कुठलाही असो त्यात पूर्णत्वाने समरस झाल्याशिवाय आशयाचा रस निर्माण होत नाही. याची खूणगाठ त्यांना मनाशी पक्की बांधलेली आहे. स्त्री असो वा पुरुष काळावर कोणाची हुकूमत चालते? मनाच्या बागेत स्वप्न कळा अलवार उमलून याव्यात असे स्त्रीला नेहमी वाटत राहते. पण जीवनात आपसूकच एक क्षण असा येतो की, काळ स्वप्नांच्या कळ्या खुडून नेतो. मनाची बाग उध्वस्त होते. स्त्रीच्या मनातली ही खंतावणारी जाणीव तिच्या एकाकीपणासह उलगडून रसिकांसमोर ठेवतात. 


स्वप्न कळ्या अलवार उमलल्या मनामध्ये अन्

सरसावत ‘त्या’ काळ येउनी खुडून गेल्या


     स्त्री जन्माची कथा अशी की नियती तिला सदानकदा सुखदुःखाच्या वाकूल्या दाखवत आलीय्. सुखाच्या शोधातली तिची भ्रमंती कधी थांबत नाही. म्हणून ती नियतीच्या विचित्र वागण्याचे गाऱ्हाणे मांडते. 


मला का फिरवतेस नियती अशी ही

सुखाच्या कधी वेदनांच्या झुल्यावर?


     न्याय देवतेच्या डोळ्यावर गडद काळी पट्टी बांधलेली असते. ती फार आंधळी झालेली असते. तिला भवतालतला अनाचार, अत्याचार दिसत नाही, अशी लोकांची धारणा आहे. जर न्यायदेवता आंधळी नसती तर तिला इथे घडणाऱ्या साऱ्याच गोष्टी स्पष्टपणे दिसल्या असत्या. काळ बदलतो आहे. धावतो आहे. असे वाटत असले तरी स्त्रीच्या जीवनात फारसा फरक पडलेला नाही. यावर नेमकेपणाने बोट ठेवत गझलकारा लिहितात. 


नसतीच न्यायदेवी जर आंधळी कदाचित

असती स्थिती इथेही मग वेगळी कदाचित


     प्राजक्ता पटवर्धन ह्या चिंतनशील, संवेदनशील मनाच्या गझलकारा आहेत. त्या तटस्थ राहूच शकत नाहीत. समाजजीवनात घडणाऱ्या वितरीत घटनांनी त्या अस्वस्थ होतात. दिवसागणिक वाढत चाललेल्या पुरुषी वर्चस्वाने,  अत्याचाराने, अन्यायाने त्यांचे मन विदीर्ण होत जाते.  पण जीवघेण्या घटना घडायच्या थांबत नाहीत. माणसे हिंस्र पशु पेक्षाही भयंकर वागतात. हे चित्र सार्वत्रिक आहे. अशा निर्दयी माणसांना माणसे तरी कसे म्हणायचे. असा प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण होतो.


लांडगे, कोल्हे, गिधाडेही बरी

माणसांना माणसे कुठवर म्हणू?


     समाजातल्या वाईट प्रवृत्तींना आरसा दाखविण्याचे काम गझलेने नेहमीच पोट तिडकीने पार पाडले आहे. सत्याची बूज राखणे हे तिचे वैशिष्ट्य आहे. ती सत्य सांगायला कचरत नाही. कोणत्याही प्रकारच्या मज्जावाला जुमानत नाही. गझलेच्या ठायी असणारा निर्भीडपणा तितक्यास निसंकोचपणे प्रकट करताना प्राजक्ता पटवर्धन लिहितात. 


आश्चर्याने बघू नका मी अशीच आहे आरशापरी

बघू नका! पण सत्य दाखवायाला हा मज्जाव कशाला



निव्वळ योगायोग: गझलसंग्रह

गझलकारा: प्राजक्ता पटवर्धन

ग्रंथयुग प्रकाशन, कळवा, ठाणे

पृष्ठे १०२ किंमत २५० रुपये





बदीऊज्जमा बिराजदार 

(साबिर सोलापुरी)



Post a Comment

0 Comments