Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

गझल मात्रा Gazalkar Sabir Solapuri


     🌼 पुस्तक परिचय 🌼





आशयाला लागू पडणारी

‘गझल मात्रा’


   सिराज शिकलगार हे गझलेचे डॉक्टर आहेत. त्यांना गझलेची अचूक नाडी गवसलेली

आहे. त्यामुळे त्यांनी दिलेली ‘मात्रा’ आशयाला लागू पडते. म्हणूनच त्यांचा प्रत्येक शेर

आशयसंपन्न बनतो, सशक्त होतो. इतकी परिणामकारक ही मात्रा आहे. हा एखाद्याचा हातगूण असतो. तो प्रत्येकाजवळ असतोच असे नाही. सिराजभाई हे तब्येतीने गझल लिहिणारे गझलकार आहेत. ते गझलेच्या प्रकृतींची खूप काळजी घेतात. गझल कधीच आशयाअभावी अशक्त होऊ नये, ती सदैव सशक्त राहावी यासाठी आशयाला हमखास 

लागू होणारी ‘मात्रा’ ते देत असतात. सिराजभाई यांचा ‘गझल मात्रा’ हा ८२ गझलांचा सोळावा संग्रह प्रकाशित झाला आहे. सुदृढ गझल कशी असते. तिचे रंगरूप कसे टवटवीत असायला हवे. हे आपणास या गझल संग्रहातून पाहण्यास मिळते. सिराजभाई यांची गझलेच्या छंद-वृत्तांवर इतकी बलदंड पकड आहे की ते कोणतेही वृत्त अगदी सहजपणे हाताळतात. मिश्र वृत्तांमध्ये तर त्यांचा हात कुणीच धरू शकत नाही. ‘गझल मात्रा’ या संग्रहाची वेगळी खासियत अशी की यातील तमाम गझला मात्रा वृत्तातील आहेत. वृत्त एकच असले तरी त्यांच्या गझलांमध्ये एकसूरीपणा नाही, पुनरावृत्ती नाही. केवळ एकाच प्रकारच्या वृत्तातील ८२ गझलांचा बहुमूल्य खजिना रसिकांना सुपूर्द करणे हे कुण्या येरा-गबाळ्याचे काम नव्हे. त्याच्या धमण्यातून गझल वाहते. असा प्रतिभावंत गझलकारच गझलेचे हे शिवधनुष्य समर्थपणे पेलू शकतो. सिराज भाई यांनी ही अतुलनीय कामगिरी चोखपणे पार पाडली आहे. ते ख-या अर्थाने कौतुकास पात्र आहेत.

       सिराज भाई हे निवृत्तीनंतरचा काळ जगत आहेत. आयुष्य उतरणीला लागले आहे.

आयुष्याच्या संध्याकाळी विवंचनांची दाटीवाटी असते. अनेक राहून गेलेल्या गोष्टीची, वस्तूंची, इच्छेची परिपूर्ती करण्याची ओढ माणसाला लागलेली असते. अशा तगमग

वाढविणाऱ्या काळात सिराजभाई एकाग्रतेने गझलेची अथक साधना करीत आहेत. त्यांच्या गझल निष्ठेला, गझल उर्जेला तोड नाही. गझलेचे व्रत अंगिकारण्याचे त्यांनी गझलेला शब्द दिला आहे. शब्द वचन, वादा असो व शपथ असो ती कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही काळात पाळली पाहिजे. शब्दाला जागले पाहिजे, केलेला वादा मोडायचा नसतो. त्यासाठी स्वभावात कणखरता असावी लागते. त्या अनुषंगाने सिराजभाई यांचा हा शेर पहा----


कणखर कट्टर स्वभाव माझा, मी कुजलेला धागा नाही

शब्द दिलेला सदा पाळला, कधी मोडला वादा नाही


     सुख जसे मृगजळासारखे असते. तसेच नष्ट ही होणारे असते. हे ऐश्वर्य, धन संपत्ती अन् प्रतिष्ठा न जाणो माणूस त्याच्या पाठीमागे एकसारखा का लागतो. आणि धनाच्या मागे लागून स्वतःचा पुरता विनाश ओढावून घेतो. पैसा, प्रतिष्ठा, वैभव या गोष्टी मागे लागून मिळत नसतात. म्हणूनच कोणतीही लालसा ही जीवनाच्या रस्त्यावर असलेले मृगजळ आहे. जितके आपण त्याच्या अधिक जवळ जाऊ तितके ते आपल्यापासून दुरावत जाते, अदृश्य होत जाते. आपल्याला बेमालुमपणे फसवत जाते. स्वार्थाने जोडलेल्या धनाची माती होऊन जाते, संपत्तीच्या हव्यासाला भंगाराची जागा असते असा इशारा आपल्याला या शेरातून मिळतो------


जरी जोडले धन स्वार्थाने माती त्याची होणे आहे

संपत्तीच्या हव्यासाला भंगाराची भीती घाला


     गझल हा सामान्य जनमाणसाच्या मनाजवळचा काव्य प्रकार आहे. त्यातून माणसाच्या सगळ्या भावभावनांचे प्रतिबिंब उमटत असते. सुख-दुःख, आशा-निराशा, प्रेम, मिलन, विरह, आनंद, आक्रोश, फसगत, फरफट असा विस्तृत परीघ गझल आपल्या बाहूत घेत असते. एकेक विषय गझलकार शेरातून अविष्कृत करत असतो. कमीत कमी शब्दातली ती अभिव्यक्ती माणसाला स्वतःचीच वाटत असते. हे गझलकाराचे सामर्थ्य असते. म्हणून सिराजभाई जनसामान्य माणसाच्या भाव भावनांना त्यांच्या शेरात आवर्जून जागा करून देतात. विद्यमान काळात माणसाच्या मनातली माया पातळ होत चालली आहे. गल्ली ते दिल्ली फसवाफसवी असह्य झाली आहे. माणूस त्याच्या अंतःकरणातल्या कैवल्याच्या खाणी पार हरवून बसला आहे. त्याच्या डोळ्यातील पाणी आटून गेले आहे. असंवेदनशीलतेने त्याला पुरते घेरून टाकले आहे. हे दुष्टचक्र सगळीकडे सारखेच फिरत आहे. त्यात कुठेच भेद उरला नाही. याची खंत मात्र सिराज भाई यांच्या संवेदनशील मनाला सतत वाटत राहते----------


डोळ्यामधले असे अचानक कसे आटले पाणी

कुठे हरविल्या माणसातल्या कैवल्याच्या खाणी


    भ्रष्टाचाराचा कॅन्सर समाजजीवनाला अंतर्बाह्य पोखरून काढत आहे. त्याला कधी काळी विश्वाचे अधिष्ठान असलेले वैद्यकीय क्षेत्र सुध्दा आता अपवाद राहिले नाही. तुरळक ठिकाणीच या क्षेत्रातील ‘रुग्णसेवा हीच ईश सेवा’ हे ब्रीद अभावाने दिसून येते. वैद्यकीय

शास्त्र हे खोऱ्याने पैसा ओढण्याचे शस्त्र बनले आहे. अनेकवेळा आवश्यकता नसतानादेखील रुग्णाच्या वेगवेगळ्या चाचण्या आणि जीवघेण्या शस्त्रक्रिया केल्या जातात. पायात साधा काटा मोडला तरी रुग्णाच्या तनामनाची फाळणी करून टाकण्यात येते. त्यातून अमाप पैसा लुटण्यात येतो. त्याच्या मनमानी कार्यपध्दतीला आव्हान देण्याची सोय नाही. ‘हम करेसो कायदा’ याच धर्तीवर ‘हम करेसो उपचार’ अशा प्रकारची बेबंदशाही या क्षेत्रात माजली आहे. यावर कोणताच ‘इलाज’ नाही. मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार, हा खरा प्रश्न आहे. याचे उदाहरणच सिराजभाई त्यांच्या शेरातून आपल्या समोर ठेवतात-----


रुतला काटा काढा म्हटले, फक्त मागणी केली

वैद्याने तर तना-मनाची, उभी फाळणी केली


     सिराजभाई कधी वरपांगी शेर लिहीत नाहीत. मानवी जगण्यातला कोणताही प्रश्न असो ते खोलात जाऊन त्याच्या अन्वयार्थाचा नव्याने शोध घेत असतात. शेवटी हाताला जे सार लागते. त्याचा शेर बनून जातो. त्यात लपवा-छपवी नसते. असा शेर तार्किक नसतो तर मार्मिक असतो, जसे की----------


जग माथ्यावर खोलात मी

रोज नव्याच्या शोधात मी


    सिराजभाई यांची गझल शैली जशी गंभीर आणि अंतर्मुख करणारी आहे तशीच ती काहीशी मिश्किल आणि तिरकसदेखील आहे. पण या मिश्किलीत उगाच कुणाला जखमी करण्याचे अस्त्र ते वापरत नाहीत. हलकी फुलकी टपली मारून टोपी उडवतात. सरकारच्या फसव्या आश्वासनाचे पितळ उघडे करतात.


कुठे थांबली मदत बरे ती सरकारी

वंचितांकडे बघून हसल्या पारंब्या


सखीच्या संबंधाने ही ते मिश्कीलीची लकेर घेतात-


खूप ऐकल्या अबोल कविता प्रेमाखातर तिच्या

चला सखीच्या माथी मारू नवरोबाची गझल


       सिराजभाई यांची ही ‘गझल मात्रा’ गुणकारी आहे. ती नक्कीच रसिकांच्या पचनी पडेल. त्यातून सुदृढ समाज रचनेची निर्मिती व्हावी. यासाठी वाकड्या वाटेने चालणाऱ्या माणसाला ते सजगतेचे भान देतात. सिराजभाईच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या हार्दिक सदिच्छा…!


गझल मात्रा: गझलसंग्रह

गझलकार: सिराज शिकलगार 

प्रकाशक: अक्षरशिल्प प्रकाशन, अमरावती

पृष्ठे: ९६ मूल्य:२००/-₹





बदीऊज्जमा बिराजदार 

(साबिर सोलापुरी)



Post a Comment

0 Comments