🌸 पुस्तक परिचय 🌸
आनंदकंदातून विलसणारा
🌷‘गझल स्वानंद’ 🌷
हे खरे आहे की गझल हा स्वानंद देणारा काव्य प्रकार आहे. परंतु केवळ स्वान्त सुखाय कुणी लिहित नाही. लिहिण्यातला स्वानंद रसिकांना द्यावा, वाटावा असे गझलकारास मनापासून वाटत असते. रसिकांच्या आनंदासाठी सतत प्रयत्न करणाऱ्यांना आपसूकच स्वानंद प्राप्त होत असतो. आनंद वृत्ती आणि समाधान ही फार मोठी सौंदर्यवर्धक साधने आहेत. प्रतिभावान गझलकार सिराज शिकलगार यांचा आनंदकंदातून विलसणारा ‘गझल स्वानंद’ हा संग्रह गझलेच्या दरबारात दाखल झाला आहे. यात सिराजभाई यांनी स्वानंदाची विविधांगी उधळण केली आहे. यातील एकेका गझलेगणिक रसिकांचा आनंद द्विगुणीत होत जातो. या संग्रहात आनंदकंद या एकाच वृत्तातील गझला असल्याने त्याला गझल स्वानंद असे शिर्षक देण्यात आले आहे. वृत्त एकच असले तरी वृत्ती आणि प्रवृत्ती वेगवेगळ्या आहेत. त्यात आडपडदा नाही. त्या सुगम, सुबक आणि ठळक आहेत. गझलविधेकडे वळण्यापूर्वी सिराजभाई कविता लिहित असत. त्यांचे १० कविता संग्रह प्रकाशित आहेत. म्हणजे ते आधी उत्तम कवी तर आहेतच. त्याच झपाट्याने ते गझला ही लिहू लागले. दीवान-ए-सिराजसह सतरा गझल संग्रह प्रकाशित झाले आहेत. ही अल्पावधीतील मामुली उपलब्धी नाही. त्यांच्याकडे भरभक्कम शब्दभांडार आहे. शुध्द गझल आकृतीबंधाची सर्वांगीण माहिती आहे. नवनवे अस्पर्शीत रदीफ, काफीये धुंडाळण्याची शोधक नजर आहे. विषयांचा अमोघ ओघ आहे. प्रयोग करण्याची हातोटी आहे. मुळात त्यांच्या खयालात स्वच्छ स्पष्टता आहे. तो खयाल रचनेत सहजपणे बसविण्यात ते वाकबगार आहेत. त्यांना अहर्निश व्यक्त होण्यात कुठलीच अडचण येत नाही. वृत्तांवरची हुकूमत, व्यासंग सखोल चिंतन आणि प्रकटीकरणाची शैली ही त्यांच्या निर्मितीची निरंतर प्रक्रिया बनली आहे. गझले मागून गझल नवी मजल गाठत राहते. प्रत्येक गझलेत अर्थाचा प्रवाहीपणा आहे. सजलपणा आहे. त्यांचे शेर सुटसुटीत, खणखणीत आहेत. त्यांच्या गझलेची व्याप्ती मोठी आहे. त्यातील आशयसृष्टी वाचकांना समृध्द करणारी आहे. त्यांचा प्रत्येक शेर जनसामान्यांचा जिवंत जीवनानुभव घेऊन येतो. एकूणात त्यांची गझल समाजाची बांधिलकी मानणारी, जपणारी आहे. याठिकाणी उद्धृत केलेल्या शेरांवरून याचा प्रत्यय यायला हरकत नाही. स्वार्थ हा मोहाचे केंद्र निर्माण करतो. मोह हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. मोहाच्या पाठीमागे धावणाऱ्यास सर्व सुखे प्राप्त झाली तरी त्याला कधीच समाधान लाभत नाही. मोह माणसाला नैतिकतेपासून दूर घेऊन जातो. मोहाच्या जंजाळात एकदा का माणूस फसला की मग त्यातून त्याची सुटका होणे दुरापास्त होते. मोहामुळे पापबुध्दी निर्माण होते. नीती आणि अनीतीमधला फरक त्यांच्या लक्षात येत नाही. अनीतीलाच निती समजून तो वागू वागतो. मासळीच्या मोहात तो पुरात वाहून जातो. सावलीच्या शोधात उन्हात भटकत जातो. मोह वाईटच असतो. मोहाला बळी पडून तो सतत चुकीच्या मार्गाचा अवलंब करतो. त्यातून त्याचा जीवन प्रवास अधःपतनाकडे सुरु होतो. तेव्हा नैतिकतेची चाड बाळगून निर्मोही जीवन जगणेच श्रेयस्कर ठरते. हा संदेश या शेरातून मिळतो--------
मोहात मासळीच्या पडले पुरात काही
शोधात सावलीच्या फिरले उन्हात काही
पाखरांना चोची पुरताच दाणा पुरतो. त्यातच ते समाधान मानतात, आनंदी राहतात. ते उद्याची अपेक्षा करत नाहीत. दाणा-पाण्याची साठवण करून ठेवत नाहीत. स्वच्छंद भरारी घेण्यात ते मश्गूल असतात. याउलट माणूस अप्पलपोटी असतो. त्याची भूक आहे तेवढ्यावर कधीच भागत नाही. अन्नधान्याची कोठारे तो गच्च भरून ठेवतो. तरीही त्याची पोटाची भ्रांत काही केल्या मिटत नाही. माणूस इतका कसा काय हावरट आहे याचे गणित सुटण्यापलीकडचे आहे. समाधान मानण्याची वृत्ती माणसांनी पाखरांकडे पाहून ती अंगिकारली पाहिजे. पाखरे आणि माणसे यांच्यातील फरक सिराजभाई यांनी स्पष्ट केला आहे. तो असा---
चोचीत एक दाणा पुरतो कसा कळेना
आनंद साजरा पण करतो कसा कळेना
असण्यापेक्षा दिसण्यावर अधिक भर देण्याचा आजचा काळ आहे. अंतरंगापेक्षा बाह्य रंगाला महत्व प्राप्त झाले आहे. चेहऱ्यावर रंगरंगोटी करून माणूस गोरापान होण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असतो. कुणालाही उजळ दिसण्याचा मोह आवरत नाही. वास्तविक बाह्यरंगापेक्षा मनाचा उमदेपणा कितीपटीने महत्वाचा असतो. कावळा त्याचा काळा रंग लपविण्यासाठी कुठही ही क्रीम वापरत नाही. विठ्ठलाचे रूप सावळे असले तरी त्याच्या मनात खोट नाही. हे बाह्य रंगावरून नाही तर अंतरंगावरूनच समजून घेतले पाहिजे असे सिराजभाई यांना वाटते-----
लपवित रंग नाही तो कावळा बरा की
हृदयात खोट नाही तो सावळा बरा की
बहुसांस्कृतिकता, विविधतेत एकता हे आपल्या देशाचे वैशिष्टय आहे. भारतात वर्षानुवर्षे विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने, एकोप्याने राहात आले आहेत. संविधानात ही सर्वधर्म समभावाचे महत्व अधोरेखित करण्यात आले आहे. जातीभेद किंवा भेदभाव न करता सर्वच समाजातील लोकांशी सौहार्दाने सहिष्णुतेने वागणे अगत्याचे आहे. कोणत्याही जाती धर्माचा अनादर न करता जातीय सलोखा राखणे हे लोकशाही प्रणालीतील प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य ठरते. परंतु काही विखारी विघ्नसंतोषींच्या डोळ्यात सलोखा खुपतो. देशाची सर्वसमावेशक प्रतिमा बिघडविण्याचा ते उठसूट प्रयत्न करत असतात. क्षुल्लक कारणावरून कुभांड रचून जातीय दंगली घडवतात. एकात्मतेला सुरुंग लावता. त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम मग निष्पाप लोकांना भोगावे लागतात. याकडे सिराजभाई लक्ष वेधतात----------
एकत्र राहिलेल्या कितीक धर्मजाती
जातीय दंगलीचा गलका कुठून आला
निवडणूकीच्या हंगामात राजकीय नेते लोककल्याणाचे आश्वासन देत अच्छे दिन आणण्याच्या घोषणा करतात. जनता वर्षानुवर्षे अच्छे दिन येणार याची प्रतीक्षा करत पण तिला लुच्चे दिनाचा प्रत्यय येत जातो. नेत्यांना आश्वासनाचा सोयीस्कर विसर पडतो. जनता दारिद्र्यात खितपत पडते. नेते गब्बर होत जातात. सरकार कोणत्याही पक्षाचे आले तरी जनतेची गरिबी काही हटत नाही. तिला कुठे थारा मिळत नाही. कित्येक निवडणुका पार पडतात तरीही जनता हाच अनुभव घेत राहते. यातून लोकशाहीची शोकांतिका सिराजभाई नेमक्या शब्दात व्यक्त करतात--------
देतो कुणी न थारा अच्छे कसे म्हणावे
दाढी मिशा उगवल्या बच्चे कसे म्हणावे
कोणत्याही परिस्थितीत माणसाची जगण्याची धडपड, अगतिकता, हतबलता, विवशता सिराज त्यांच्या शेरातून मांडतात. परंतु त्यांची मांडणी संयतपणे होते. ते आक्रमक बंड करून उठत नाहीत. विद्रोहाची हाक देत नाहीत. नेत्यांची दांभिकता, मुजोरी, शोष वंचना याकडे ते सूचकनेते इशारा करतात. लोकांचे लक्ष वेधतात. अंतर्मुख करतात. हेच गझल स्वानंदचे यश आहे.
गझल स्वानंद: गझलसंग्रह
गझलकार: सिराज शिकलगार
प्रकाशक: अक्षरशिल्प प्रकाशन, अमरावती
पृष्ठे: ९६ मूल्य:२००/-₹
बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर सोलापुरी)
0 Comments