Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

तरही गझलांची अनोखी मैफल Gazalkar Sabir Solapuri

 🍀 पुस्तक परिचय 🍀



🌷तरही गझलांची अनोखी मैफल🌷


     जकाल मराठीतल्या काही गझलकारांनाही तरही गझलेने भुरळ घातल्याचे दिसून येते. ‘तरही’ हा देखील गझलांचाच प्रकार आहे. फार्शी, उर्दूत पूर्वीपासूनच तरही गझलची परंपरा प्रचलित आहे. मुशायऱ्यात एखाद्या बुर्जुर्ग शायराचा मिसरा देऊन त्यावर अन्य होतकरू गझलकारांना गझल लिहिण्याचे आवाहन करण्यात यायचे. एका तऱ्हेने हे आव्हानच असायचे. मुशायऱ्यात उपस्थित गझलकार गझल लिहायचे. नंतर काळात ही प्रथाच पडली. मराठीतही उत्तम तरही गझला लिहिल्या जात आहेत. त्याला लोकप्रियताही लाभत आहे. एखाद्या शायराच्या मतल्यातील मिसऱ्यावर आपल्या स्वतंत्र कल्पना नाविन्यपूर्ण शेरांमध्ये ओवून अख्खी गझल पूर्ण करायची असते. हे एक प्रकारे गझलकाराच्या प्रतिभेला दिले गेलेले आव्हानच. नव्या ऊर्मीच्या अनेक गझलकारांनी हे शिवधनुष्य आपल्या प्रतिभा सामर्थ्याने पेलेले आहे. त्यात आता खोपोलीचे गझलकार डॉ. सुभाष कटकदौंड यांची मोलाची भर पडली आहे. 

     महाजन पब्लिशिंग हाऊसने त्यांचा ‘येताना तू नकळत ये’ हा तरही गझलसंग्रह प्रकाशित केला आहे. त्यात गझलसम्राट सुरेश भट यांच्या १९ मिसऱ्यावर आणि ज्येष्ठ गझलकार ए.के. शेख यांच्या ७४ मिश-मिसऱ्यावर आधारित अशा ९३ तरही गझलांचा समावेश आहे. प्रयोगाच्या पातळीवरील प्रस्तुत तरही गझलसंग्रह वाचताना रसिकांना आगळावेगळा प्रत्यय येईल, ते याचे उत्स्फूर्त स्वागत करतील अशी आशा वाटते.

     मतल्यातील कंसातील शेर सुरेश भट यांचे आहेत. त्यावर नंतरचे शेर कटकदौंड यांनी लिहून गझला पूर्ण केल्या आहेत. मतल्यात दोघांच्या दोन वेगवेगळ्या ओळी असल्या तरी त्या इतकी एकजीव झाल्या आहेत की त्यातला आशय एकसंध वाटतो. एकेक मिसऱ्यावर कटकदौंड यांनी स्वतंत्र खयालांनी गझलेची सुंदर इमारत बांधली आहे. ती विलोभनीय आहे. हीच तर तरही गझलेची खासियत आहे.

     आसवांनी स्वतःला भिजवण्यात फारसा अर्थ नाही. डोळ्यातून घळाघळा वाहणाऱ्या आसवांवर आळा घालावाच लागतो, नाही तर ती त्रासदायक ठरतात. ती जगालाही दिसतात. आसवांमुळे अवहेलनाच वाट्याला येते. म्हणून आसवांना वाहू द्यायचे नसते. अन् स्वतःही त्यात वाहून जायचं नसते. दुःखाचेही असेच आहे. दुःख मनात रिचवायचे नसते. दुःखाची साठवण माणसाचे जगणे मुश्किल करून टाकते. दुःखाला गोंजारत न बसता त्याला हुसकावून लावले की सुखाची वाट दृष्टिपथात येऊ लागते.


(आसवांनी मी मला भिजवू कशाला)

दुःख माझे मी मनी रिचवू कशाला


     माणूस जिवंत असताना त्याच्याकडून बर्‍याच गोष्टी राहून जातात. त्याने काही संकल्प सोडलेले असतात. काही स्वप्ने पाहिलेली असतात. काही उद्दिष्टे पूर्ण करायची असतात. परंतू ती पूर्णत्वास जातातच असे नाही. जीवन गतीमान आहे ते काळाबरोबर धावत असते. ते कसे सरत जाते, हे कळत नाही. अचानक मृत्यु येऊन गाठतो मग सरणावर जाताना या साऱ्या गोष्टी कळत जातात, छळत राहतात.


(इतकेच मला जाताना सरणावर कळले होते)

सुंदर या जगण्यावरती मन माझे जडले होते.


     माणसाचे जगणे असेच असते की, पायाला लाभलेली वाट तो आयुष्यभर गपगुमान चालत राहतो. या वाटचालीबद्दल त्याची तक्रार नसते. परंतु सुरेश भट हे बंडखोर गझलकार होते. मळलेल्या वाटेने ते जाणारे नव्हते. त्याच्या वाट्याला आलेली वाटचाल त्यांना मंजूर नव्हती.


(ही न मंजूर वाटचाल मला)

वाट माझी हवी विशाल मला


     भटांच्या मिसऱ्याला कटकदौंड यांनी जोडलेली दुसरी ओळ अतिशय चपखल आहे. शेराला नेमका आशय देणारी आहे.  माणसाच्या मुळ स्वभावाचा थांग पत्ता लागत नाही. माणसाचे गूढ उलगडत नाही. माणसात फरक करता येत नाही. सगळे एकाच माळेचे मणी असतात. कोण आपला कोण परका हे ही उमजत नाही.


(हे ही असेच होते ते ही तसेच होते)

मी योजले मनाशी ते ही असेच होते


      ए.के. शेख हे कटकदौंड यांचे गझलगुरु आहेत. त्यांच्या बहुतांशी मिसऱ्यांवर त्यांनी गझला लिहिल्यात. त्यात प्रेमभावनेच्या अधिकाधिक गझला आहेत. ‘येताना तू नकळत ये’ गझल संग्रहाच्या या शीर्षकावरूनच ही गोष्ट स्पष्ट होते. प्रेम म्हणजे नेमके काय, हे सांगता येत नाही. ‘कुणी तरी आपल्यासाठी जगतो आहे आणि आपण कुणासाठी तरी जगतो आहे’ ही अंतर्मनातली एवढी अर्थपूर्ण जाणीव म्हणजेच प्रेम ! कटकदौंड यांना ही जाणीव आहे.

     प्रेमात ओठबंद असतात तेव्हा डोळेच बोलत असतात. हे बोलणे अन् वागणे कोड्यातले वाटत असले तरी ते अंतर्मनाला कळणारे असते. ते समजून घेता आले की तक्रारीला जागा उरत नाही.


(ओठ बंद हे काय बोलणे)

का उगाच कोड्यात वागणे


     सखीची सोबत लाभली की जगण्याला पालवी फुटते. सखी काय नसते ती सर्वस्व असते. प्रेम, वात्सल्य, माया असते. तिची साथ नसेल तर जगणे सप्पक होऊन जाते. त्याला लज्जतच नसते. विरहाचे होतात वार, जगणे बनते दुश्वार. सखी विना जगण्याची कल्पनाही करता येत नाही. प्रस्तूत शेर त्याचीच साक्ष देतो.


(प्रेम, वात्सल्य, माया सखे तूच गं )

साथ माझ्या जगाया सखे तूच गं


     धुंद प्रीत जगताना तिचा हात हाती नसेल तर ? प्रीतीला धुंदी तरी कशी चढणार, प्रीतीतली बेहोषी तरी कशी अनुभवता येणार ?  तिचा हात हाती नसेल तर रिकाम्या हातांनी चांदण्यातून कसे फिरायचे ? प्रेम चांदण्याइतके शीतल असते, चंद्राइतके सुंदर असते. हे कुठल्या तोंडाने सांगायचे हे कटकदौंड लिहितात.


धुंद प्रीती जगताना हात हाती का नको

(चांदण्यातुन चालताना हात हाती का नको)


     खऱ्या प्रेमात राग, द्वेष, मत्सर, नकार, तक्रार नसतेच मुळी. प्रीतीची वाट चालताना हात अन् साथ दोन्हीही महत्वाचे. पुढचा शेर येतो तिची मनधरणी करणारा


कधी हात माझा सखे तू धरावा

(तुझा गोड होकार मजला मिळावा)


     दोन तरुण मनात प्रेमाची शिंपण झाली की तिची अन त्याची प्रत्येक भेट अनमोल होते. प्रत्येक गोष्टीला महत्व उरते. भेटीत घडलेला प्रत्येक प्रसंग आठवणींना सुगंधित करून जातो. खास काही नसले तरी मनातल्या सगळ्या गोष्टी तिला सांगण्यासाठी भेटायला पाहिजे, असे त्याला वाटायला लागते.


खास नाही पण तरी भेटायला भेटू पुन्हा

(राहिल्या गोष्टी किती सांगायला भेटू पुन्हा)


     प्रीतीच्या अनेकविध तऱ्हा, विभ्रम, कोमल, सुवासिक भावभावना कटकदौंड यांनी त्यांच्या गझलांमधून उत्कट अन अलगदपणे टिपल्या आहेत. तुला पाहिले की बरे वाटते. येताना तू नकळत ये, मन आकाशाचे कर तू, तुला कळणार हे केव्हा, चंद्र आता मावळाया लागला, नाही म्हणायला आता असे करुया, आले रडू तरीही कोणी रडू नये. प्रीतीच्या या हळुवार भावना प्रेमिकांच्या मनाला स्पर्श करणाऱ्या आहेत. उल्हासित करणा-या आहेत. 


येताना तू नकळत ये : तरही गझल संग्रह

गझलकार : डॉ. सुभाष कटकदौंड

प्रकाशक : महाजन पल्बिशिंग हाऊस, पुणे

पृष्ठे : १२०, मूल्य : २८० रु.




बदीऊज्जमा बिराजदार 

(साबिर सोलापुरी)

Post a Comment

0 Comments